टीम मंगळवेढा टाईम्स।
उजनी धरणात २४ टक्के पाणीसाठा असून आता सोलापूर शहर, पंढरपूर, सांगोला व मंगळवेढ्यासाठी भीमा नदीतून पाणी सोडले आहे. धरणातील पाच टीएमसी पाणी या आवर्तनासाठी जाणार असल्याने धरण पुन्हा उणेच्या उंबरठ्यावर येईल.
पावसाने अशीच ओढ दिल्यास उन्हाळ्यात धरण तब्बल ७० टक्क्यांपर्यंत मायनस जाईल आणि धरणावरील अवलंबून बहुतेक पाणीपुरवठा योजना पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत काही दिवस बंद राहतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.
पावसाळ्यामुळे जून ते ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत उजनीतून शेतीसाठी पाणी सोडण्याची गरज भासत नाही. पण, नोव्हेंबरनंतर मेपर्यंत दोन ते तीन आवर्तने सोडली जातात. मात्र, यंदा तशी परिस्थिती नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून उजनीतील पाणी सध्या पिण्यासाठीच राखून ठेवले जात आहे.
दरम्यान, सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्याने तळ गाठल्याने धरणातून पाच हजार क्युसेकने भीमा नदीद्वारे पाणी सोडण्यात आले आहे.
ते पाणी साधारणत: २९ सप्टेंबरपर्यंत औजमध्ये पोचणार आहे. ३० सप्टेंबरला धरणातून सोडलेले पाणी बंद केले जाईल दरम्यान, अद्यापही धरणाला मोठ्या पावसाची आशा आहे.
धरण ३३ टक्क्यांवर गेल्याशिवाय शेतीला पाणी सोडणे अशक्यच आहे. पावसाचा खंड असाच राहिल्यास जिल्ह्यात दुष्काळ असणार आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाण्यासाठी टॅंकर सुरु होतील, अशीही सद्य:स्थिती आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे, असे आवाहन केले जात आहे
उजनीची सद्य:स्थिती
एकूण पाणीसाठा – ७५.७९ टीएमसी, जिवंतसाठा – ११.१५ टीएमसी, उपयुक्त साठ्याची टक्केवारी – २०.५३ टक्के, उजनीतून सोडलेले पाणी – ५००० क्युसेक.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज