टीम मंगळवेढा टाईम्स । धनगर समाज आरक्षणासाठी राज्यभरात, गावागावांत, तालुक्यांत, जिल्ह्यांमध्ये आंदोलन करीत आहे. याचा जर राज्य सरकारने विचार नाही केला, धनगरांच्या भावनेशी खेळला तर येथून पुढच्या काळामध्ये राज्यामध्ये मंत्र्यांच्या बंगल्यांसमोर आम्ही आंदोलन करू, ‘मातोश्री’वर आंदोलन करू, असा इशारा आ. गोपीचंद पडळकर यांनी दिला.
धनगर समाजाला आरक्षण देऊन त्यांना एस.टी.चा दाखला देण्यात यावा. त्याचबरोबर ज्या योजना आदिवासींना त्याच योजना धनगरांना द्या, अशी मागणी करीत झोपी गेलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी आ. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथे चंद्रभागेच्या महाव्दार घाटावर ‘ढोल बजाओ, सरकार जगाओ’ आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात पक्ष, गट-तट विसरुन हजारोंच्या संख्येने धनगर समाजबांधव सहभागी झाले होते.
पुढे बोलताना आ. पडळकर म्हणाले की, सरकारने धनगर समाजाच्या मागण्यांची दखल घेऊन समाजाला न्याय द्यावा. अन्यथा राज्यातील मंत्री, सत्ताधारी आमदारांच्या घरांसमोर जाऊन आंदोलन करु.
मी स्वत: ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन ढोल वाजवणार आहे. सगळ्या नेत्यांना जागे करेन. हे धनगर समाजाचे आंदोलन आहे.
याला कोणाचेही नेतृत्व नाही. मी या आंदोलनात कार्यकर्ता म्हणून सहभागी झालो आहे. धनगर समाजाच्या हितासाठी जे जे काही करता येईल ते ते आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत. हे आंदोलन भविष्यात अधिक तीव्र करण्यात येईल.
त्यामुळे राज्य सरकारने याची दखल घ्यावी. त्यामुळे राज्य सरकाने अध्यादेश काढून राज्यात ‘धनगड’ ही जमात अस्तित्वात नाही, ‘धनगर’ हीच जमात आहे.
या धनगर समाजाचे आरक्षण राज्य सरकारने अध्यादेश काढून चालू करावे व केंद्र सरकारला सांगावे की, आम्ही धनगर समाजाची आरक्षणाची अंमलबजावणी केलेली आहे. त्यांची जनगणना करुन त्यांची जी टक्केवारी आहे ती सांगून त्यानुसार आरक्षण द्यावे.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात धनगर आरक्षणाबाबत धनगर समाजातील मंत्री, आमदार यांची बैठक झाली होती. या बैठकीत अध्यादेश काढायला सांगितला होता. काही अडचणी येत असतील तर काय करावे हे सांगा, असे म्हटले होते.
त्यावेळी कोर्टात प्रतिज्ञापत्र (अॅफिडेव्हिट) दाखल केले. आमची कोर्टात केस चालू आहे. त्यामुळे आम्ही 70 टक्के लढाई जिंकलेली आहे. राहिलेल्या 30 टक्क्यांसाठी आम्ही लढाई लढत आहोत. आता आम्हाला राजकारण करायचे नाही.
आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी करणे, एसटीचा दाखला मिळवणे हे महत्त्वाचे आहे. धनगर समाजाला आजपर्यंत आरक्षणापासून कोणी दूर ठेवले आहे हे योग्यवेळी सांगेन, असे आ. पडळकर म्हणाले.
या आंदोलनात धनगर समाजाचे नेते माऊली हळणवर, प्रा. सुभाष मस्के, पं.स. सदस्य दादा मोटे, रमेश हाके आदींसह हजारो समाजबांधव उपस्थित होते.
Don’t play with the sentiments of Dhangar Samaj, otherwise the agitation on Matoshri is a warning from MLA Gopichand Padalkar
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज