टीम मंगळवेढा टाईम्स ।
आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर आलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे शिवसेना नेते अनिल सावंत यांनी मंगळवेढा तालुक्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधले.

यंदा तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने शेतकरी आणि पशुपालक मोठ्या संकटात सापडले असून, तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी अनिल सावंत यांनी एका निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

खरीप पेरण्या धोक्यात; ३५ हजार हेक्टरवर संकट
उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात अनिल सावंत यांनी तालुक्यातील भीषण वास्तव मांडले आहे. तालुक्यात यंदा केवळ ११ टक्क्यांपर्यंतच खरीप पेरणी होऊ शकली आहे. दमदार पावसाने ओढ दिल्यामुळे सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्णपणे धोक्यात आल्या आहेत. पाऊस नसल्याने उभी पिके करपून चालली असून शेतकरी पुरता चिंताग्रस्त झाला आहे. शेतीसोबतच आता तालुक्यातील पशुधनाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

चारा टंचाई तीव्र; पशुपालक आर्थिक अडचणीत
मंगळवेढा तालुक्यात ९४ हजारांपेक्षा जास्त पशुधन असून त्यांच्यासाठी हिरव्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. नाईलाजास्तव पशुपालकांना भीमा नदीकाठचा ऊस तब्बल ४ हजार रुपये प्रति टन दराने खरेदी करावा लागत आहे. दुधातून मिळणारे उत्पन्न वैरणीवरच खर्च होत असल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. यासाठी शासनाने तातडीने चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

’जलजीवन’चे अपयश आणि म्हैसाळचा विस्कळीत पुरवठा
तालुक्यातील पाणीटंचाईवर बोट ठेवत अनिल सावंत यांनी प्रशासकीय त्रुटींवर तीव्र आक्षेप घेतला. तालुक्यातील अनेक गावांमध्ये ‘जलजीवन मिशन’ची कामे अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. भोसे प्रादेशिक योजना पूर्ण क्षमतेने चालत नाही, तर आंधळगाव प्रादेशिक योजनेवर कोट्यवधींचा खर्च होऊनही गावे तहानलेलीच आहेत.

तसेच म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून दक्षिण भागातील गावांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याने या भागातील साठवण तलाव तातडीने भरून देण्याची गरज आहे. पाणी नसलेल्या गावांमध्ये तातडीने शासकीय टँकर सुरू करावेत, अशी मागणी सावंतांनी केली.
मजुरांच्या हाताला काम द्या; वीज पुरवठा सुरळीत करा
भीमा नदीकाठच्या शेतीला नियमित व पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्याने पिके जळून खाक होत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागात मजुरांच्या हाताला काम नसल्याने शासनाच्या १२५ दिवस रोजगार देण्याच्या हमी योजनेअंतर्गत गावात तातडीने सार्वजनिक विकासकामे सुरू करावीत, जेणेकरून मजुरांचे स्थलांतर थांबेल, असे निवेदनात नमूद केले आहे.

निर्णायक बैठकीला मान्यवरांची उपस्थिती
निवेदन देताना अनिल सावंत यांच्यासोबत मंगळवेढा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मुजफ्फरभाई काझी, माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, संतोष रंदवे, सिताराम भगरे, संजय लेंडवे, सुनील चेळेकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिक सध्या अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने संवेदनशीलतेने विचार करून तालुक्याला तातडीने ठोस प्रशासकीय व आर्थिक मदत द्यावी, अशी जाहीर अपेक्षा अनिल सावंत यांनी व्यक्त केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












