टीम मंगळवेढा टाईम्स ।
तांत्रिक अडचणींचा विचार करता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास राज्य निवडणूक आयोगाने आज (ता. 29 डिसेंबर) परवानगी दिली.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 30 डिसेंबर रोजीची वेळही आता संध्याकाळी साडेपाचपर्यंत करण्यात आली आहे. पूर्वीची ही वेळ दुपारी तीनपर्यंत होती. निवडणूक आयोगाने या बाबतचे निर्देश आज दुपारी जारी केले आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्णयात म्हटले आहे की, उमेदवारी अर्ज दाखल करताना 28 डिसेंबरपासून तांत्रिक अडचणी येत आहेत. यात सर्व्हर तसेच इंटरनेटची गती कमी असणे, या मुळे अनेक उमेदवारांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापासून वंचित राहू नये व त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी; म्हणून आयोगाने उमेदवारी अर्ज पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) स्वीकारण्याचा तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ 30 डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाचपर्यंत करण्याचाही निर्णय घेतला आहे.
पारंपरिक पद्धतीने स्वीकारलेले उमेदवारी अर्ज संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध उमेदवारी अर्ज संगणक चालकांच्या मदतीने संगणक प्रणालीत आरओ लॉगईन’ मधून भरून घेण्याचेही निर्देश आयोगाने दिले आहेत. या निर्णयामुळे अनेक उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने संगणकावर अर्ज दाखल करताना ग्रामीण भागातील विशेषतः महिला उमेदवारांची मोठी दमछाक होत आहे, या मुळे यंत्रणेवरील ताण कमी होण्याऐवजी ताण वाढल्याचेच चित्र होते.
तांत्रिक बाबी परिपूर्ण नसल्याने इंटरनेटला स्पीड नसणे व सर्व्हर डाऊन असल्याने अनेकांना पळापळ करावी लागत आहे. या निर्णयामुळे आता पारंपरिक पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज