टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुणे पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत होईल, असे चित्र जरी निर्माण केले जात असले, तरी अपक्ष उमेदवार नीता ढमाले यांनी प्रचारात मोठी बाजी मारली आहे. त्यांना मिळणारा प्रतिसादही लक्षणीय आहे.
पदवीधर मतदारसंघ हा कारखानदारांचे राजकारणात पुनर्वसन करण्यासाठी नसून पदवीधरांचे प्रश्न सोडवणारा योग्य प्रतिनिधी विधान परिषदेत पाठवण्यासाठी आहे, ही अपक्ष उमेदवार नीता ढमाले यांची भूमिका तरुण मतदारांना अपील होत असल्याने भाजप-आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
उमेदवार नीता ढमाले यांच्या प्रचारार्थ बार्शी (जि. सोलापूर) तसेच शिरोळ, हातकंणगले येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवीधर मेळाव्याला मतदारांनी गर्दी केली होती.
प्रमुख पक्षांच्या उमेदवारांपेक्षा मतदारांमध्ये नीता ढमाले यांचीच अधिक लोकप्रियता असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.पदवीधर मेळाव्यात मतदारांना संबोधित करताना नीता ढमाले म्हणाल्या, “घटनेने राजकीय पक्षांसाठी विधानसभेची रचना केली आहे.
मात्र, विधान परिषदेचा पदवीधर मतदारसंघ हा राजकीय लोकांसाठी नसून पदवीधरांच्या खऱ्या प्रतिनिधींसाठी राखीव आहे. घटनेने पदवीधरांना विशेषाधिकार वापरुन आपला प्रतिनिधी निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने पदवीधरांना त्यांच्या अधिकाराबद्दल जागृत केले नाही. तेच काम करण्यासाठी मी इथे आली आहे.”
पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवार देताना कुठलाही पक्ष किंवा संघटना पदवीधरांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करुन घेत नाही किंवा त्यांचे मत विचारात घेत नाही. जर उमेदवार देतानाही तुम्हाला विचारात घेतले जात नसेल, तर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित पक्ष, संघटना कितपत गांभीर्याने काम करतील हा प्रश्न आहे,” असे ढमाले म्हणाल्या.
कुणीही निवडून आले तरी आपल्याला काही फरक पडणार नाही हा गैरसमज सर्वप्रथम दूर करा, असे आवाहन ढमाले यांनी केले. त्या म्हणाल्या,”घटनेने दिलेल्या विशेषाधिकाराचे महत्व ओळखून स्वतःच्या भवितव्यासाठी योग्य उमेदवाराला मत द्या.
राजकीय पक्षांनी थोपवलेला उमेदवार निवडून आपले भवितव्य राजकिय पक्षांच्या हातात जाऊ देऊ नका. पदवीधरांनाही स्वाभिमान आहे, हे दाखवून द्या. जोपर्यंत तुम्ही मतपेटीद्वारे तुमचे अस्तित्व दाखवणार नाही, तोपर्यंत तुमचा वापर केवळ मतदानापुरताच केला जाईल, हे लक्षात घ्या.”
“आजपर्यंत वेगवेगळ्या पक्षांचे लोक पदवीधरांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहात गेले, पण त्यांच्या कामाविषयी तुम्ही समाधानी आहात का हा प्रश्न स्वतःला विचारा. तुमचे उत्तर जर “नाही’ असे असेल तर हीच बदल घडवण्याची योग्य वेळ आहे.
आता जर तुम्ही चुकीचा उमेदवार निवडून दिला तर भविष्यात पश्चाताप करुन काही उपयोग होणार नाही, त्यासाठी आताच योग्य उमेदवार निवडून द्या. मी तुम्हाला वचन देते की मला जर तुम्ही काम करण्याची संधी दिली, तर तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही,” असा विश्वासही त्यांनी या वेळी पदवीधरांना दिला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज