टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे, मात्र आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केलं आहे.
त्यामुळे आता महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू शकतो, अशी शक्यता आहे. फक्त मुद्दा हा आहे की हा लॉकडाऊन किती दिवसांचा असणार आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबत देखील स्पष्ट संकेत दिले आहेत.
राज्यातील परिस्थिती गंभीर बनत चालली आहे, त्यामुळे राज्याला कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत निक्षून सांगितलं आहे. राज्याला 8 किंवा 15 दिवसाच्या कडक निर्बंधांची गरज असल्याचं ते म्हणाले आहेत.
दोन दिवसात यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला राष्ट्रवादीचे नेते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पाठिंबा दिल्याची माहिती आहे, तसेच राज्याचे मुख्य सचिन सीताराम कुंटे यांनी देखील लॉकडाऊनचं समर्थन केलं आहे.
राज्यात लॉकडाऊन लावला नाही तर 15 एप्रिलनंतर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, याकडे सीताराम कुंटे यांनी लक्ष वेधलं.दरम्यान, राज्यात सध्याच कोरोनानं थैमान घातलं आहे. राज्यभरात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे.
रेमडेसीवीर इंजेक्शन मिळत नाहीये, वेंटिलेटर्स देखील संपले आहेत. काही भागांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचं चित्र आहे. अशाच कोरोना रुग्णांची वाढती संख्या महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे.
त्यामुळे लवकरच लॉकडाऊनसंदर्भात निर्णय होऊ शकतो, तसेच तयारीसाठी लोकांना वेळ देखील दिला जाऊ शकतो.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज