टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्यात सहा महिन्यापूर्वी सत्तातर झाले. शिवसेनेतून ४० आमदार शिंदे गटात गेल्याने ठाकरे सरकार कोसळले. शिवसेनेत फूट पडणार, अशी कुणकुण काही राजकीय नेत्यांना लागली होती.
यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “आमदार फुटणार ही महिती उद्धव ठाकरेंना दोन,तीन वेळा दिली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही फोन करुन बैठक घेतली होती. पण ‘माझ्या आमदारावर माझा विश्वास आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण स्वत: पक्षनेतृत्वाने आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास टाकला तिथेच खरी गफलत झाली,”
“या सगळ्या गोष्टी घडून दिल्या गेल्या आहेत. आमदारांना खुशाल जाऊ दिलं गेलं. तिकडे हे व्हायला नको होतं. मी स्वतः उद्धवजींना सावध केलं होतं पण ते बोलले की मी बोलेन, एकनाथ शिंदे यांच्याशी तो आमचा पक्षांतर्गंत मामला आहे, असं उत्तर त्यांनी दिलं,” असे अजित पवार यांनी सांगितले
अडीच वर्षांपूर्वी राजभवनात भल्या पहाटे शपथविधी झाला होता, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
यावरुन अजित पवार यांना नेहमीच प्रश्न विचारण्यात येतो. यावर ” सारखं सारखं भल्या भल्या पहाटे नका म्हणत जाऊ, सकाळी 8 वाजता तो शपथविधी झाला होता. त्यावर मी जास्त बोलणार नाही,” असे म्हणत अजित पवार यांनी या विषयावर बोलणं टाळलं.
नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे विजयी झाले. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा २९ हजारांनी पराभव झाला आहे. सत्यजीत तांबे यांना तब्बल 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. त्यांचा तब्बल 29 हजार 465 मतांनी विजय झाला.
सत्यजीत तांबे यांच्या विजयावर प्रतिक्रिया देतांना अजित पवार यांनी तांबेंना राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली होती, असे विधान केले आहे. “मविआतल्याही काहींनी सत्यजीतला मदत केली”त्या मतदारसंघात त्याला एवढी मतं मिळाल्यामुळे महाविकास आघाडीतील इतरांनीही त्याला मदत केलेली दिसते.
त्याचे निवडणुकीचे आडाखे आणि मविआतल्या लोकांनी, मतदारांनी त्याला दिलेली साथ यामुळेच एवढं दैदिप्यमान यश मिळालं आहे,” असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज