टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी धरणाच्या पाण्यात उतरुन शासनविरोधी घोषणा देत आंदोलन केल्याप्रकरणी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर उर्फ भैय्या देशमुखसह उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या चौदा जणांविरुध्द टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश भंग करून उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्यात येऊ नये यासाठी देशमुख आणि सहकाऱ्यांनी आंदोलन केले.
यावेळी पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना आरेरावेची भाषा वापरून त्यांच्याशी हुज्जत घातली म्हणून प्रभाकर भैय्या देशमुख (रा. पाटकूल ता. मोहोळ), अतुल खुपसे (रा. उपळवाटे, ता. माढा), माऊली हळणकर (रा. ईश्वर वठार, ता. पंढरपूर), दत्ताभाऊ व्यवहारे (रा. पांढरेवाडी, ता. पंढरपूर), विठ्ठल मस्के (रा. शेवरे, ता.माढा),
आण्णासाहेब जाधव (रा.तांदुळवाडी, ता.माढा), किरण भांगे, बापू दादा मेटकरी (रा. पाटकळ, ता.मंगळवेढा), बळीराम गायकवाड (रा.रिधोरे, ता. माढा), जयप्रकाश मोरे,औदुंबर केरू गायकवाड (रा. रोपळे कव्हे, ता.माढा), धनाजी विष्णू गडदे, श्रावण लवटे (रा.नंदेश्वर ता. मंगळवेढा), अभिजीत पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्यात येऊ नये, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे देशमुखसह उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात येणार होते. त्याकरिता पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी उजनी धरण परिसरात बंदोबस्त तैनात केला होता.
सकाळी अकराच्या सुमारास धरणातील उस्मानाबाद पाणीपुरवठा योजना व एनटीपीसी पाणीपुरवठा केंद्राच्या मधोमध संघर्ष समितीचे देशमुख व त्यांचे सहकारी जमले. त्यावेळी श्री. केंद्रे यांनी कोविड- 19 या साथरोगाच्या अनुषंगाने जमावबंदीचा आदेश असल्याचे सांगून आंदोलन न करण्याचे आवाहन केले.
परंतु आंदोलकांनी अरेरावीची भाषा वापरून हुज्जत घातली. त्यांचे काहीही न ऐकता धरणाच्या पाण्यात जाऊन शासनाविरुद्ध घोषणाबाजी करीत आंदोलन केले. पोलिस कॉन्स्टेबल किशोर तळेकर यांनी फिर्याद दिली. हवालदार स्वामीनाथ लोंढे तपास करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज