टीम मंगळवेढा टाईम्स ।
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात Budget 2022 अनेक घोषणा केल्या आहेत तसेच महागाईने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्नही या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे.
मोबाईल फोन, चार्जर, कॅमेरा लेन्स आदी इलेक्ट्रीक वस्तूंसह कपडे आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांना दिलासा मिळाला आहे. त
सेच यंदाच्या बजेटमध्ये कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे नोकरदारांच्या पदरी निराशा आली आहे. या शिवाय कृषी क्षेत्रावर या अर्थसंकल्पात विशेष फोकस करण्यात आला असून त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
या शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हेल्थ सेक्टरवरही या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. या शिवाय अर्थमंत्री सीतारामण यांनी काही केमिकल्सवरील कस्टम ड्युटी घटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मिथेनॉलचा समावेश आहे. देशांतर्गत मॅन्यूफॅक्चरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
काय स्वस्त होणार
चामडे, बूट, चपला, विदेशी सामान, कपडे, शेतीशी संबंधित वस्तू, पॅकेजिंग डब्बे, पॉलिश केलेले डायमंड, परदेशी छत्र्या, मोबाईल फोन, मोबाईल चार्जर, जेम्स अँड ज्वेलरी
महाग
छत्र्या महाग होणार, क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक महाग
निर्मला सीतारमन यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
पुढील 3 वर्षात नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार ; रेल्वे संदर्भात मोठी घोषणा- ४०० नव्या गाड्या सुरू करणार, एलआयसी चा आयपीओ लवकरच येणार, ‘हर घर, नल से जल’द्वारे घरांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्याची योजना
२ लाख अंगणवाड्या अद्ययावत करणार, अर्थमंत्र्यांची घोषणा, शक्ती, वात्सल्य, सक्षम अंगणवाडी २.० योजना सुरू, शेतकऱ्यांना डिजिटल सेवा देण्यात येतील, देशाचा आर्थिक विकास दर 9 टक्क्यांहून अधिक राहील
‘सबका प्रयास’, हा मंत्र आपल्याला प्रगतीच्या दिशेनं पुढे नेईल, विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा, शालेय शिक्षणासाठी १०० टीव्ही चॅनेल, स्थानिक भाषेत शिक्षण, देशाचा जीडीपी 9.2 टक्के राहण्याचा अंदाज
रेल्वे, जल, हवाई वेगवान वाहतुकीसाठी गुंतवणूक करणार, १०० नवे कार्गो जाळे विणणार, गतीशक्ती मास्टर प्लॅनद्वारे पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार, शहरी वाहतूक रेल्वे मार्गाशी जोडणार, पुढील पाच वर्षांत ६० लाख नव्या रोजगारांच्या निर्मितीचे लक्ष्य
कृषी क्षेत्रातील स्टार्ट अप प्रकल्पांना नाबार्डच्या माध्यमातून मदत करणार, 2022 मध्ये देशात 5G सर्व्हिस सुरु होणार, पर्वतमाला योजनेतून डोंगराळ भागात प्रवास आणि पर्यटनाला चालना देणार, यंदाच्या वर्षापासून देशात ई-पासपोर्ट उपलब्ध होतील आणि त्यात चिप्स असतील
पोस्ट ऑफिसमध्येही आता ऑनलाइन हस्तांतरण शक्य, देशात तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार, पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर होणार, कर भराताना चुका राहिल्या असल्यास दुरुस्ती करण्याची संधी
राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा, स्ट्रील स्क्रॅपवरील कर सवलत कालावधी वाढणार, कॉर्पोरेट सरचार्च कमी करण्यात येणार सरकारी टेंडरचे नियम बदलणार, संपूर्ण प्रक्रिया Digital होणार
महाराष्ट्रासाठी फायद्याची तरतूद कोणती?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज नदीजोड प्रकल्पासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली. अर्थसंकल्पात त्यांनी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत वाढवण्यावर भर दिला.
जलसंपदा विकास मंत्रालयाच्या मदतीने देशातील 5 मोठ्या नद्या जोडण्याचे कामही केले जाणार. महाराष्ट्रातील तापी – नर्मदा, गोदावरी-कृष्णा आणि दमनगंगा- पिंजल या प्रकल्पांना जोडलं जाणार आहे. त्याचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे.
शेतीसाठी किसान ड्रोन्सचा वापर
अर्थमंत्र्यांनी किसान ड्रोन्सचा वापर आता शेतीमध्ये केला जाईल, अशी घोषणा केली. पिकांची पाहणी करणे, जमिनीच्या नोंदी ठेवणे तसेच किटकनाशकांच्या फवारणीसाठी हे कृषी ड्रोन्स वापरले जातात. कृषी आणि पिक उत्पादनासाठी या तंत्रज्ञानाचा जास्तीत जा्स्त वापर होऊ शकेल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही फायद्याची योजना ठरू सकेल.
जमिनीचं रजिस्ट्रेशन डिजिटल
यापुढे जमिनीची कागदपत्रे डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. तसंच जागांचं रजिस्ट्रेशन कागदपत्रांच्या आधारे कार्यालयात न जाता कुठूनही करता येईल, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
प्राप्तिकर रचनेत बदल नाही
मागील वर्षीच्या कर रचनेत कोणताही बदल करण्यात आला नाही. मात्र फिनटेक आणि डिजिटलायझेशनवर भर देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. तसेच रिटर्न फायलिंग प्रक्रियेत त्रुटी आढळल्यास ती दुरुस्त करण्यासाठी अधिक सवलत यंदा देण्यात आली आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये आता बँकिंगही
पोस्ट ऑफिसमध्ये आता ऑनलाइन हस्तांतरण शक्य होणार असून कोअर बँकिंग सेवेअंतर्गतही ते येईल. 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग सुरु करण्यात येणार आहे. 2022 पासून पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल बँकिंगवर काम केले जाईल. पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध होणार, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.
दीड लाख नवे पोस्ट ऑफिस सुरू करणार
पोस्ट ऑफिसातील बँक व्यवहारांसह रोजगार निर्मितीवरही भर देण्यात आला आहे. त्यानुसार तब्बल 1.5 लाख नवे पोस्ट ऑफिस सुरु करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. मात्र, या निर्णयाने बँकाना फटका बसण्याची शक्यता असली तरी देशात आर्थिक व्यवहार वाढण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
यासह 5G सर्व्हिस देशात सुरु होईल आणि गावा-गावांमध्ये ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. तसेच दूरसंचार क्षेत्रात नोकरीच्या नवीन संधी शोधल्या जातील, असं अर्थमंत्र्यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज