मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
महसूल विभागातील सुनावण्यांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. निर्धारित वेळेत निकालासाठी नवी ‘कार्यपध्दती’ लागू करण्यात आली आहे. सुनावण्यांच्या संपूर्ण कामकाजासह निकालपत्रे मराठी भाषेतूनच बंधनकारक करण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री बावनकुळे यांचा पुढाकार घेत शासन निर्णय लागू केला आहे.

यापुढे महसूल विभागातील सर्व अर्धन्यायिक कामकाजात मराठी भाषेचा वापर
राज्यभरातील महसूल अधिकारी आणि प्राधिकरणांकडे दाखल होणारी अर्धन्यायीक प्रकरणे आता अधिक वेगाने निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवीन ‘मानक कार्यपध्दती’ (एसओपी) निश्चित करून तिची अंमलबजावणी आजपासून लागू केली आहे.
या संदर्भातील शासन आदेश आज काढण्यात आला असून, यापुढे महसूल विभागातील सर्व अर्धन्यायिक कामकाजात मराठी भाषेचा वापर तसेच निकालपत्रे मराठी भाषेतून बंधनकारक करण्यात आले आहेत.

शासन तसेच महसूल अधिकारी, प्राधिकाऱ्यांकडे दाखल होणारे अर्धन्यायिक प्रकरणे हाताळण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून, 29 पानांच्या शासन आदेशातून यापुढेची वाटचाल निश्चित आली आहे.

अर्धन्यायीक कामकाजामधील पीठासीन अधिकारी यांना त्यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या यांची जाणीव नसणे, नैसर्गिक न्यायतत्वांचे पालन न करणे, प्रकरणातील वस्तुस्थिती, तथ्ये व सांविधिक तरतुदींचा विचार न करता व यथायोग्य कार्यासक्ती न करता (without application of mind) स्वच्छंद निर्णय पारित करणे, अर्ज/अपील दाखल करण्यास झालेल्या विलंबाबाबत पुरेसे कारण नसताना विलंब माफ करणे, संबंधित अधिनियमाचे सखोल ज्ञान नसणे, अर्धन्यायीक अर्ज/अपील दाखल करून घेताना त्याची छानणी न करणे,
अधिकारिता नसताना निर्णय पारित करणे इत्यादी सारख्या अर्धन्यायीक कार्यपध्दतीविषयक गंभीर त्रुटी निर्दशनास आलेल्या असल्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही व्यवस्था सुधारण्यासाठी कार्यपद्धती लागू करून प्रभावी पाऊल उचलले आहे. नवीन कार्यपध्दतीनुसार आता सुनावणीची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य केला आहे.
सर्व महसूल अधिकाऱ्यांना आठवड्यातून किमान दोन वेळा (शक्यतो मंगळवार आणि शुक्रवार) सुनावणी घेणे बंधनकारक असेल. केवळ ठोस कारण असल्यास सुनावणी एकदाच तहकूब करता येईल. सर्व प्रकारचे अंतरिम आणि अंतिम निर्णय ‘e-QJ Court’ प्रणालीवर नोंदवून डिजिटल स्वाक्षरीनेच दिले जातील.

दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय आणि योग्य कारणमीमांसा दिल्याशिवाय आदेश पारित करता येणार नाही. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जास्तीत जास्त आठ आठवड्यांच्या आत सकारण आदेश पारित करणे आवश्यक आहे.
गौणखनिज प्रकरणे, शेतरस्ता उपलब्ध करून देणे, दरखास्त प्रकरणे, कलम 155 अंतर्गत लेखनप्रमाद दुरुस्ती, तसेच महसूल संहितेतील विविध प्रकरणांच्या सुनावणीसंदर्भातही स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे या शासन निर्णयात नमूद करण्यात आली आहेत. या निर्णयामुळे महसूल न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होऊन सामान्य शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्याचा आमचा मानस आहे. महसूल अधिकाऱ्यांच्या अर्धन्यायीक कामकाजामध्ये सुधारणा करून गतीमान कार्यप्रणाली करून निकालांचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
यापूर्वी विविध शासन निर्णयाव्दारे अर्धन्यायीक कामकाजाबाबत दिशा निर्देश देण्यात आलेले आहेत. या सर्व शासन निर्णयांचा, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, क्षेत्रीय स्तरावरील सूचना व विभागीय आयुक्त, पुणे यांनी केलेल्या शिफारशी यांचा समतोल साधून, अर्धन्यायीक कामकाज व कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करण्याचा शासनाचा उद्देश असल्याचे मत मंत्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












