टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून उदयाला आलेली “समविचारी आघाडी” आता आगामी निवडणुकीत परिचारक गट पक्ष आदेश झुगारून समविचारी आघाडी टिकवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाने दामाजी साखर कारखाना निवडणुकीमध्ये स्वपक्षाचे आमदार समाधान आवताडे यांच्या पॅनलला विरोध करत ‘समविचारी आघाडी’ तून निवडणूक लढवून आ.आवताडे यांना दामाजी कारखान्यातून हद्दपार केले असले तरी
येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये परिचारक गटाला पक्षादेश मानावा लागणार आहे.
आगामी निवडणुकीत पक्ष जो आदेश देईल तेच करावे लागणार आहे. अन्यथा त्यांच्या पक्षविरोधी भूमिकेच्या तक्रारी वरष्ठिांकडे गेल्यास त्यांच्या नाराजीस परिचारक यांना सामोरे जावे लागणार आहे, असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
नुकत्याच झालेल्या दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मंगळवेढा तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी समविचारी आघाडी स्थापन केली होती.
यामध्ये परिचारक समर्थक १० संचालक व भालके समर्थक ९ संचालक निवडून आले आहेत.
या निवडणूक कालावधीमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी कुठेही सक्रिय सहभाग घेतला नाही. त्या-त्या स्थानिक कार्यकर्त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते.
स्वत: सक्रिय सहभाग न घेता कार्यकर्त्यांना अधिकार देऊन पंढरपुरातून भालके यांचे नाव तर ‘दामाजी’तून आ.आवताडे यांना हद्दपार करण्यात त्यांचा वाटा असल्याचे सांगण्यात येते.
सर्वांचा ताळमेळ घालून समविचारी आघाडी तयार करत जरी आ.आवताडे यांना दामाजी कारखान्यातून बाहेर काढले असले तरी सर्वच निवडणुका ‘समविचारी आघाडी’ कडून लढवणे पुढील काळात अशक्य असणार आहे.
आगामी निवडणुकांमध्ये ‘समविचारी आघाडी’ची रणनीती कामी येणार नाही. ‘समविचारी आघाडी’चा प्रयोग काही जणांच्या अंगलट येणार आहे.
त्यामुळे आ.आवताडे यांचे पक्षातील नेत्यांशी असलेले संबंध पाहता आगामी निवडणुकां करिता पक्षवाढीचा विचार करून त्यांना विचारणा करून ते जो निर्णय घेतील तो स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मान्य करावा लागणार आहे.
आगामी निवडणूक पक्षीय चिन्हावर लढवावी लागणार असल्यामुळे साहजिकच परिचारक व आवताडे यांना समझोता करावाच लागणार आहे.
मात्र त्यांच्या विरोधात आव्हान देण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीकडे मजबूत फळी सध्यातरी दिसत नाही. आगामी काळात हे दोन्ही पक्ष कशा पध्दतीने पक्षबांधणी करतात/ यावर त्या पक्षांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत ‘समविचारी आघाडी’चा प्रयोग यशस्वी ठरला असला तरी आगामी निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवण्यासाठी पक्षादेश आल्यास ‘समविचारी आघाडी’चा ‘इस्कूट’ होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज