टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा रविवार किंवा सोमवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून करण्यात येणार आहे.या मतदारसंघातून भगीरथ भालके हे प्रबळ दावेदार असून जयश्री भालके यांनी उमेदवारीची मागणीच केली नसल्याचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी सांगितले.
या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून भगीरथ भालके, जयश्री भालके या दोन नावांची चर्चा आहे. या दोन नावातूनच एकाला उमेदवारी देण्यात देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यासंदर्भात आज रविवार २८ मार्च रोजी बारामती येथे खा.शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बैठक होणार आहे.या बैठकीनंतर पक्षाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात येणार असल्याची बोलले जात आहे.
मध्यंतरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोर्टी येथे पार पडलेल्या बैठकीत बहुतांश जणांनी उमेदवार म्हणून भगीरथ भालके यांना पसंती दिली होती. तर युवराज पाटील यांच्याकडूनही उमेदवारीची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान भालके कुटुंबात उमेदवारी मिळाली तर त्यांना गटबाजी ला सामोरे जावे लागणार आहे त्याचबरोबर मित्र पक्षांनी केलेली बंडखोरी याचा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसणार आहे.
आ.भारत भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची धुरा भगीरथ भालके यांच्याकडे सोपविण्यात आली. या अॅक्शनची कोणतीही रिअॅक्शन पोटनिवडणुकीत होऊ नये , यासाठी राष्ट्रवादीकडून सावध भूमिका घेतली जात असून जयश्री भालके यांचे नावही उमेदवार म्हणून चर्चेत असल्याचे बोलले जात आहे.
राज्याच्या राजकारणात काँग्रेस राष्ट्रवादी-शिवसेना या पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही उमेदवारी दाखल केल्याने पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आघाडीत बिघाडी होऊ नये यासाठी राष्ट्रवादीकडून सावध भूमिका घेतली जात आहे.(पुण्यनगरी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज