मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
राज्यात गतवर्षी झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खा. संजय राऊत आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांच्यातील वाक्युद्ध काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठी चूक केली आहे, त्यांनी चांद्रयानातून खा. संजय राऊत यांना चंद्रावर सोडायला हवे होते. खासदार संजय राऊत चंद्रावर गेले असते तर महाराष्ट्रातील राजकारण शांत झाले असते, असे प्रतिपादन शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांनी केले.
पुढे बोलताना आ.पाटील म्हणाले, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्दयावर अजूनही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्यावी, अजूनही वेळ गेलेली नाही, उद्धव ठाकरे यांनी याबाबत विचार करावा, असेही यावेळी आ.पाटील यांनी नमूद केले.
२०१९ च्या सत्तांतरातही आम्हाला एकामागे एक असे चार वेगवेगळ्या हॉटेलमध्ये घेऊन जाण्यात आले होते, परंतु याबाबत आम्ही वाच्यता करणार नाही.
उध्दव ठाकरे यांनी आम्हाला डांबून ठेवण्याची भाषा करू नये, त्यांनीच जर स्वतःला घरात डांबून ठेवले नसते तर आज ही वेळच आली नसती, अशा शब्दांत आ.पाटील ज्यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
गतवर्षी झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खा.संजय राऊत हे नेहमीच आ.शहाजी पाटील यांच्या रडारवर राहिले आहेत. खासदार राऊत हे दररोज पत्रकार परिषद आणि अन्य माध्यमातून वादग्रस्त वक्तव्य करून राज्यात अशांतता निर्माण करत आहेत. त्यांच्या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्र त्रस्त आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात सोडलेल्या चांद्रयान- ३ मध्ये त्यांना बसवून चंद्रावर सोडले असते तर राज्यातील किरकीर बंद झाली असती. संपूर्ण राज्य शांत झाले असते, असा उपरोधिक टोलाही शेवटी आ.पाटील यांनी खा.संजय राऊत यांना लगावला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज