टीम मंगळवेढा टाईम्स ।
वीजबिलाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. विधानसभेत त्यांना घेराव घातला जाऊ नये; म्हणून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वीज कनेक्शन तोडणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र शेवटी पुन्हा वीज कनेक्शन तोडणीवरील स्थगिती हटवली.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांना संधी मिळाली आहे की त्यांनी खोटारड्या मंत्र्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन करत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
सोलापुरात आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. यावेळी आंबेडकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावरही टीका केली.
ऊर्जामंत्री नितीन राऊत हे दुबळे मंत्री असल्याची टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली. वाढीव वीज बिलांसदर्भात ऊर्जा खात्याने 50 टक्के वीजबिल माफीचा प्रस्ताव तयार केला होता.
मात्र, राऊत त्यावर ठामपणे भूमिका घेऊ शकले नाहीत. ते कॉंग्रेसचे दुबळे मंत्री आहेत. त्यातही मागासवर्गीय असल्याने बारामतीकरांच्या पुढे ते जाऊ शकले नाहीत. या सर्वामध्ये बारामती अडथळा असल्याची टीका वंचितचे प्रमुख आंबेडकर यांनी केली.
दरम्यान वीज कनेक्शन तोडणीसाठी कोणी आल्यास त्याला बडवा असे धक्कादायक आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी केले. कोणी वीज कापायला आले तर त्यांना बडवा, कितीही गुन्हे दाखल झाले तर होऊद्या.
शासकीय गुन्हे चालवायला किती सरकारी वकील आहेत? असा प्रश्न उपस्थित करत प्रकाश आंबेडकरांनी वीजबिल वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडणीला विरोध दर्शवला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज