टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील बंद भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील समाविष्ट सर्व गावांना पाणी मिळाल्याशिवाय शिखर समिती स्थापन करू नये अशी मागणी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी प्रसिध्दीपत्रकानव्ये केली आहे.
पंचायत समितीच्या सभागृहात शिखर समिती स्थापन करण्यावरून खडाजंगी झाली.रात्री उपसभापती सुरेश ढोणे यांनी बैठक घेण्याचा प्रयत्न केला. पंचायत समितीच्या राजकारणात खळबळ उडाली त्यावर अध्यक्ष आवताडे यांनी प्रसिध्दीपत्रक दिले.
त्यात म्हटले आहे की सध्या योजना अर्धवट अवस्थेमध्ये असून या योजनेपासून लेंडवेचिंचाळे, शिरसी, सलगर बु., खवे,शिवणगी,आसबेवाडी या गावांना पाणी पोहोचले नाही तरीही संबंधित गावांना पाण्याचा लाभ न मिळता पाणीपट्टी आकारणी केली.
या योजनेतील समाविष्ट गावांची एकूण पाणीपट्टी रुपये 42 लाख 82 हजार 168 इतकी आकारली. तर वीज बिल 64 लाख रुपये भरावयाचे आहे.जवळपास बावीस लाखाची तफावत असून याची जबाबदारी कोणावर निश्चित करायची.
दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी या योजनेच्या सुरुवातीच्या एक वर्ष ट्रायल बेसवर कसल्याही प्रकारची पाणीपट्टी आकारली जाणार नाही असे सरपंच ग्रामसेवक व जनतेस सांगितले तसेच 2019- 20 या कालावधीत स्थानिक लोकप्रतिनिधी ही गाव भेट दौऱ्यामध्ये टंचाई परिस्थिती असल्याने पाणीपट्टी आकारली जाणार नाही असे सांगितल्यामुळे दोन वर्षाच्या कालावधीतील पाणीपट्टी काही ग्रामपंचायतीने वाढीव दराने आकारणी केली नाही.
वाढीव पाणीपट्टी संबंधित गावातील जनता ग्रामपंचायतीकडे भरण्यास तयार नाही. उचेठाण जॅकवेल लाईट बिल रुपये 59 लाख सहा हजार 739 व जुनोनी जलशुद्धीकरण केंद्र रुपये पाच लाख 36 हजार 40 अशी एकूण रुपये 64 लाख 42 हजार 771 थकित आहे.
ही योजना गेल्या नऊ महिन्यापासून बंद आहे त्याच बरोबर बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन नादुरुस्त आहे सध्या कोरोना मारामारीचे संकट असून जनतेच्या हाताला काम नाही अशा परिस्थितीत सदरची योजना अशा अवस्थेत असताना शिखर समिती स्थापन करून योजना ताब्यात घेणे कितपत योग्य आहे.
शिखर समिती स्थापन करून योजना चालू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे आणि हा आर्थिक भार शिखर समितीला पेलवणार नाही त्यामुळे जिल्हा परिषदेने टंचाई मधून रुपये 18 लाखाची तरतूद करून ठेकेदाराला पुढील तीन महिन्यासाठी चालविण्याचे आदेश दिले.
त्यामुळे पुढील तीन महिन्यापर्यंत शिखर समिती स्थापन करण्याचा विचार करण्यात येऊ नये यापूर्वी आंधळगाव नंदुर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेने ताब्यात घेतल्या नाहीत व अद्याप शिखर समिती स्थापन केली नाही तर अर्धवट अवस्थेत असणारी भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना घाईगडबडीने शिखर समिती स्थापन करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न अध्यक्ष आवताडेनी उपस्थित केला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज