मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील निळवंडी रोडवरील जाधव वस्ती येथे एका शेतकरी कुटुंबावर ओढवलेल्या भीषण प्रसंगामुळे खळबळ उडाली आहे. सर्व कर्ज वन टाईम सेटलमेंट (OTS) योजनेअंतर्गत पूर्ण भरलेले असतानाही बँकेने शेतकऱ्याची कोट्यवधी रुपयांची जमीन परस्पर विकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या जमिनीचा ताबा घेण्यासाठी पोलीस आणि बँकेचे कर्मचारी गेले असता तेथे मोठी झटापट झाली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

7 लाख 67 हजारांचे कर्ज फेडले
मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी येथील एका शेतकरी कुटुंबावर बँकेचे 7 लाख 67 हजार रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज त्यांनी ‘वन टाईम सेटलमेंट’ (OTS) योजनेअंतर्गत पूर्णपणे भरले होते. असे असतानाही बँकेच्या काही स्थानिक अधिकाऱ्यांनी मुंबईतील सेंट्रल ऑफिसला चुकीची माहिती पुरवली.

परस्पर कागदपत्रे तयार करून आणि स्थानिक एजंटशी संगनमत करून शेतकऱ्याची कोट्यवधी रुपयांची जमीन अवघ्या 73 लाख रुपयांमध्ये विकल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाकडून केला जात आहे.

ताबा घेताना पोलिसांची अरेरावी
बँकेचे कर्मचारी जेव्हा या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्यासोबत पोलीस बंदोबस्तही उपस्थित होता. स्थानिक पोलीस प्रशासनाने जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला असता, अन्यायग्रस्त शेतकरी कुटुंबाने त्यास तीव्र विरोध दर्शवला.

या दरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी झटापट झाली. पोलिसांनी अरेरावी करतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद करणाऱ्या एका युवकाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप शेतकरी कुटुंबाने केला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

न्यायालयाच्या आदेशानेच कारवाई केल्याचा दावा
दुसरीकडे, पोलीस प्रशासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. कोर्टाच्या कायदेशीर आदेशानुसारच बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत पोलीस पथक घटनास्थळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गेले होते, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर (X) शेअर करत पोलीस आणि बँक प्रशासनाच्या या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
संपूर्ण कर्ज भरलेले असताना शेतकऱ्याची जमीन हडपणाऱ्या आणि शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










