टीम मंगळवेढा टाईम्स ।
हवामानातील बदलाचा परिणाम म्हणून 15 ते 18 फेब्रुवारीदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसासह गारा पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 16 फेब्रुवारीला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
17 फेब्रुवारीला मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या तीनही विभागांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
18 फेब्रुवारीलाही विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी असेल. कोकण विभागात 17 आणि 18 फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.
पावसाच्या कालावधीत रात्रीच्या किमान तापमानात आणखी वाढीची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या या अंदाजानंतर शेतकऱ्यांच्या चिंता आणखी वाढणार आहेत. पाऊस पडल्यास यामुळे पीकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे.
18 फेब्रुवारी रोजी आकाश सामन्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार 16 ते 18 फेब्रुवारी या दोन दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवला आहे.
पूर्व-विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील पूर्व भागांत 16 फेब्रुवारीला वादळी पावसाचा अंदाज आहे. तर 17 तारखेला विदर्भासह, मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत 18 फेब्रुवारीला वादळी पावसाचा अंदाज आहे. तर या दरम्यान काही प्रमाणात गारपिटीची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी 19 तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील.
यानंतर मात्र हवामान हळूहळू पूर्वपदावर येऊन त्यात स्थिरता यायला सुरुवात होईल आणि 20 तारखेपासून राज्यातील हवामान पूर्णपणे स्थिर होईल असा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज