टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा असलेला दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली.
निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार समाधान आवताडे यांना स्वकीयांनीच पराभवाची चव चाखायला लावली त्यामुळे आगामी काळात आमदार समाधान आवताडे यांना दामाजी कारखान्यातील पराभव हा यशाची पहिली पायरी होती असे समजून काम करावे लागणार आहे.
भाजपचे आमदार असलेल्या स्वपक्षाचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच विधानसभेला मदत केलेले विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचे कार्यकर्ते विरोधात जाऊन
भालके गट, राष्ट्रवादी, काँग्रेस गटाच्या सहकार्याने “समविचारी” आघाडी स्थापन करत या आघाडीने आमदार अवताडे यांना एकाकी पाडत त्यांच्याकडून कारखाना काढून घेतला आहे.
त्यामुळे आता आगामी काळात आमदार अवताडे यांना गावोगावी स्वतःची निष्ठावान व जनमतातील कार्यकर्त्याची स्वतंत्र फौज उभी करून तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचत कार्यकर्त्यांची मोळी घट्ट बांधली तरच आगामी काळात दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही.
मंगळवेढा तालुक्याने नेहमीच पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाच्या राजकारणाला महत्त्व दिले आहे. याअगोदरही तालुक्यात आवताडे ज्या पक्षाकडे त्या पक्षाचे पारडे नेहमीच जड असायचे,
मात्र मधल्या काळामध्ये आमदार समाधान आवताडे व त्यांचे चुलते बबनराव अवताडे यांच्यात फाटाफुट झाल्यामुळे समविचारी आघाडीतील नेत्यांनी बबनराव अवताडे यांना सोबत घेत समविचारी आघाडीने मोळी बांधून भक्कम गट स्थापन केला.
व ऐनवेळी बबनराव अवताडे यांनाच बाजूला करून समचारी आघाडीने ही निवडणूक लढवली त्यामुळे बबनराव अवताडे व समाधान आवताडे यांना मनोमिलन करावे लागले असले तरी या मनोमिलनाला थोडा उशीर झाल्याचे ही जाणकार सांगत आहेत.
सहा वर्षे दामाजी कारखान्याचा एकहाती कारभार करत शेतकऱ्यांना दहा रुपये किलोने साखर दिली, अपघाती विमा सुरू करून अनेक सभासद कामगारांना मदत केली शेजारचे कारखाने बंद पडले असताना यांनी कारखाना सुस्थितीत सुरू ठेवला.
मात्र विरोधकांनी केलेल्या आरोपांचे खंडन करण्यात आ.आवताडे कमी पडले, आरोपांचे खंडन करण्यापेक्षा मी सहा वर्षात काय काम केले आणि पुढे सत्ता आल्यास काय करणार हेच ते प्रचारात सांगत बसले पण ते सभासदांना पचनी पडले नाही.
त्यामुळे पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अपयश आले असले तरी या कारखान्याचे अपयशी यशाचीच एक पायरी आहे असे समजून त्यांना काम करावे लागणार आहे.
राजकारणात जास्त सरळमार्गी राहून चालत नाही असे काही अनुभवी लोक सांगतात हा सल्ला त्यांना मान्य करावा लागणार आहे. कारण जो-जो येईल त्याला ते आपलाच समजतात पण जवळ आलेला माणूस कोणत्या उद्देशाने आला आहे याची खातरजमा करणे गरजेचे असते.
‘कामापूरते मागे पुढे करायचे आणि निवडणूक लागली की विरोधात जायचं’ असं वागणाऱ्या लोकांची संख्या त्यांच्या आसपास जास्त दिसते आशा लोकांना ही वेळीच त्यांच्या कार्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे.
राजकारणात समाधान आवताडे यांची पाटी कोरी आहे दामाजी करखान्याव्यतिरिक्त त्यांच्यावर आरोप करण्यासारखे दुसरे काही साधन विरोधकाकडे नव्हते प्रत्येक निवडणुक काळात कारखान्याच्या माध्यमातूनच अवताडे यांच्यावर अनेक आरोप विरोधकांकडून केले जायचे.
मात्र आता कारखाना ही हाती नसल्यामुळे विरोधकांना आरोप करण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागणार आहेत.
आगामी काळात मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन योजना,बसवेश्वर स्मारक, रस्ते, आरोग्य,पाणी या समस्यांकडे भर देत तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या एमआयडीसीचा प्रश्न ,बेरोजगारी , नगरपालिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भर देऊन जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्याची संधी त्यांना आहे.
ठराविक कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाजूला येत सर्वसामान्य लोकांत मिसळून आमदार अवताडे यांनी काम करणे गरजेचे आहे.
कायम गाडीत असणाऱ्या डिजिटल पुढाऱ्यांकडून ग्राउंड रिपोर्ट घेऊन अंदाज बांधण्यापेक्षा तळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मत विचारात घेत काम करणे गरजेचे आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत त्या निवडणुकांना सामोरे जाताना आमदार अवताडे यांनी स्टार्चचे कपडे घालून मागेपुढे करणाऱ्या डिजिटल नेत्यापेक्षा सामान्य माणसाच्या व्यथा जाणून घेऊन जनमानसात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद देत त्यांची मोळी बांधली तर आमदार अवताडे यांचा झंझावात कोणीही रोखू शकणार नाही असे जाणकारांचे मत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज