टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील व तालुक्यातील नवी व जुनी कार्यकारणी बरखास्त केले असल्याचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, मंगळवेढा तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संदर्भात, तालुक्यातील व शहरातील प्रमुख पदाधिकारी, नेते यांच्या लेखी निवेदन पत्रानुसार व येणाऱ्या जिल्हा परिषद / पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, संघटनात्मक फेरबदल करण्याचा निर्णय दि. १/१०/२०२१ रोजी घेण्यात आला होता.
त्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील जुन्या कार्यकारिणीतील पदाधिकारी व नेते , राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांना वरील संदर्भाने भेटण्यासाठी गेले होते.
आदरणीय पवार साहेबांनी त्यांची बाजू ऐकून घेऊन सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चौकशी केली होती . त्याच बरोबर नवनियुक्त पदाधिकारी व तालुका व शहरातील इतर पदाधिकारी देखील आदरणीय पवार साहेबांना भेटण्यासाठी गेले होते.
या पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी देखील पवार साहेबांच्या समोर आपली भूमिका वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये मांडली . जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांची व नेत्यांची बाजू ऐकून आदरणीय पवार साहेबांनी , मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी कार्यकारणी संदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,
पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे, जिल्हाध्यक्ष , कार्यकारी जिल्हाध्यक्ष , तसेच जुन्या व नव्या कार्यकारिणीतील प्रमुख दोन ते तीन पदाधिकारी व दोन्ही बाजूचे एक दोन प्रमुख नेते यांची संयुक्त बैठक घेऊन मंगळवेढा तालुका कार्यकरीणी संदर्भात निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
त्याप्रमाणे प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री यांची वेळ घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे मी जिल्हाध्यक्ष या नात्याने, मंगळवेढा तालुका व शहरातील संघटनात्मक बदलासंदर्भात अंतिम निर्णय होईपर्यंत, मंगळवेढा तालुका व शहर राष्ट्रवादी कार्यकारणी ( जुनी व नवी ) बरखास्त करण्याचा निर्णय घेत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पक्ष संघटनेत बदल करताना जुन्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मंगळवेढा शहर व तालुका राष्ट्रवादी निवडी जाहीर केल्याने नाराज झालेल्या २० पदाधिकारी यांनी पक्षनेते अजित जगताप व तालुकाध्यक्ष भारत बेदरे यांच्या नेतृत्वाखाली गोविंदबाग गाठत हायकमांड शरद पवार यांच्याकडे जिल्हा नेतृत्वाबद्दल तक्रारीचा पाढा वाचला होता.
तसेच नव्या निवडीला आव्हान दिले होते. दुसऱ्याच दिवशी खा. शरद पवार यांचा सोलापूर दौरा झाला त्यादरम्यान याबाबत गुप्त चर्चा झाली, अखेरीस जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी या नव्या निवडीला स्थगिती दिल्याचे पत्रच दिले.
पुढील दोन तीन महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत गटबाजी समोर आली असल्याने पक्षाला याचा किती फटका बसतोय हे येणाऱ्या काळात समजणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज