टीम मंगळवेढा टाईम्स ।
लाखो मराठा बांधवांसह मनोज जरांगे पाटील हे राजधानी मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहेत. आज सकाळपासून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सरकारच्या चर्चा सुरू होत्या.
सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चांमध्ये काही सकारात्मक निर्णय झाल्याचेही स्पष्ट संकेत मिळत आहेत. या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी वाशीच्या छत्रपती शिवाजी चौकात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारने अध्यादेश द्या, तोपर्यंत मुंबईतून जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील?
“छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन मनोज जरांगे यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. सकाळी शासनासोबत चर्चा झाली. आरक्षणाच्या मागणीसाठी आपण मुंबईमध्ये आलो. सरकारने त्यांची भूमिका आणि आपलीही भूमिका ऐकली. ५४ लाख ओबीसी नोंदी सापडल्या असतील तर त्याचे वाटप करा, अशी आपली मागणी होती. ज्या ५४ लाख मराठा बांधवांच्या नोंदी मिळाल्यात, त्यांचे वाटप होईल,” असे जरांगे पाटील म्हणालेत.
काय आहेत मागण्या?
तसेच “ओबीसी दाखल्याची एक नोंद जरी सापडली तरी 50-50 जणांना त्याचा लाभ मिळतोय. यामुळे 2 कोटी मराठे लाभार्थी ठरत आहेत. प्रमाणपत्रासाठी आपल्याला अर्ज करणे गरजेचे आहे. गावागावात ज्यांची नोंद मिळाली आहे, त्यांनी अर्ज करण्यास सुरूवात करा,” असेही जरांगे पाटील म्हणाले आहेत.
३७ लाख प्रमाणपत्र वाटप…
“54 लाख प्रमाणपत्रांपैकी 37 लाख प्रमाणपत्रांचे वाटप आतापर्यंत करण्यात आले असल्याची माहिती सरकारने दिली आहे. त्याची माहिती मागवली आहे. ३७ लाख म्हणजे कोणाला दिले, त्याची नावासहित माहिती द्या, अशी मागणी केली आहे. अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्यायची मागणी केली होती, ते मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत, असे सरकारने म्हटले आहे, मात्र त्याचे पत्र दिले नाही,” अशी माहिती जरांगे पाटलांनी दिली आहे.
सरकारला पुन्हा अल्टिमेटम…
सरकारला अध्यादेश काढण्यासाठी उद्या सकाळी 11 पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. अध्यादेश नाही काढला तर उपोषणासाठी आझाद मैदानावर जाणार, पण आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी फिरणार नाही, असे मनोज जरांगेंनी स्पष्ट केले आहे. तसेच आजचा मुक्काम वाशीमध्येच असेल, मात्र उद्या अध्यादेश न आल्यास आझाद मैदानावर जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मराठा समाजाला १०० टक्के मोफत शिक्षण देण्याच्या मागणी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या मुंबईच्या वेशीवर डेरेदाखल आहेत. त्यांनी जाहीरपणे त्यांच्या मागण्या सरकारकडे मांडल्या आहेत. सरकारच्या प्रतिनिधींना या मागण्यांविषयी अवगत करण्यात आलेले आहे.
यामध्ये मराठा समाजाला १०० टक्के मोफत शिक्षण देण्याच्या मागणीकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. जरांगे पाटील यांनी या मागणीची पूर्तता करण्यासाठी, शासन आदेश, परिपत्रक काढण्यासाठी आज रात्रीचा वेळ दिला आहे. उद्या दुपारपर्यंत इतर मागण्यांबाबत सरकारची प्रतिक्रिया आल्यानंतर आझाद मैदानात पोहचायचे की नाही, हे ठरणार आहे.
क्युरेटिव्ही पीटीशनचा विषय सुप्रीम कोर्टात आहे. ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सग्या सोयऱ्यांच्या माध्यमातून जर एखादा मराठा राहिला. जुळलं नाही तर ते १०० टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला जगातलं १०० टक्के शिक्षण मोफत करण्यात यावं अशी आपली मागणी आहे. या मुद्द्यावर सरकारने सांगितलं की, राज्यातील मुलींना केजी टू पीजी शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पण फक्त मुलींनाच शिक्षण देणार. मुलांना दिले सोडून. खुट्टी ठोकलीच. त्यामुळे मोफत शिक्षणाचा जीआर आज रात्रीपर्यंतच काढा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
नोकरभरतीबाबत ही मागणी
सरकार ज्या नोकर भरती करणार आहे त्या आरक्षण मिळेपर्यंत करायच्या नाहीत. जर भरती करायची असेल आमच्या जागा राखीव ठेवून करा असे सरकारला त्यांनी बजावलं. जिल्हास्तरावर वसतिगृहाची मागणी केली होती. मेन मागणी आरक्षणाची होती. रात्रभर जीआर वाचून त्यावर चर्चा करणार आहे. याबाबत काही चर्चा करायची असेल तर माझ्याकडे या. माझ्याशी चर्चा करा. मी परस्पर निर्णय घेतल्याचा ठपका ठेवू नका. आपण तीन मुद्द्यांवर आरक्षण लावून धरला आहे. त्यातील अध्यादेशाचा मुद्दा महत्त्वाचा आहे असे त्यांनी सभेला संबोधित करताना सांगितले.
३७ लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र
सरकारने ३७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिलं आहे. त्याच एक पत्र आपल्याला दिल्याचं त्यांनी सांगितले. वंशावळी जोडाल्यानंतर इतरांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी एक समिती गठीत केली आहे. ज्या लोकांना प्रमाणपत्र दिलं त्यांचा डेटा मागितला आहे. नेमकं कुणाला दिलं हे कळेल. डेटा लावून धरणं हा महत्त्वाचा मुद्दा नाही. मुद्दा प्रमाणपत्राचा आहे, असे ते म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज