टीम मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क !
उजनी धरणातील पाणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पदाचा गैरवापर करून पळवले असल्याचा आरोप केला जात आहे. यात आता करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे हेही जिल्हयातील नागरिकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
उजनीच्या ५ टीएमसी पाण्यासंदर्भात चुकीच्या पद्धतीने काही घडल्यास, मी सोलापूर जिल्हावासीयांच्या सोबत खांद्याला खांदा लाऊन लढेन अशी भूमिका घेतली आहे.
दरम्यान अजित पवार घराणं माझ्या हृदयात असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात बोलताना आ.शिंदे म्हणाले, गरज पडल्यास मी माझ्या मतदार संघासाठी व जिल्ह्यातील जनतेसाठी सर्वस्व पणाला लावेन, पण उजनी धरणांमधलं सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे एक थेंबही पाणी इतरत्र वळवू देणार नाही.
माझ्या व माझ्या नेत्यांच्या संबंधित विरोधक नेहमी गैरसमज व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. माझे नेते अजितदादा पवार व पवार कुटूंबीय यांच्या संदर्भात माझ्या जीवनात असाधारण महत्त्व आहे.
ते मी हृदयात जपलंय, त्याचा इतरांच्यासारखा बाजार कधीच मांडला नाही. त्या भांडवलावर कधीच कुठलं पद मिळवले नाही वा कोणत्याही संस्था वाचवण्यासाठी त्याचा वापर केला नाही.
जेव्हा कधी वेळ आली तेव्हा इतर नेत्यांसारखा पळ सुध्दा काढला नाही. शेवटच्या क्षणी नेत्यांनी जो आदेश दिला तो मी पाळला आहे. भलेही त्यात माझा राजकीय नफा तोटा झाला असेल,असे त्यांनी म्हटले आहे.(स्त्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज