मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सध्या अतिवृष्टीमुळे काही भागात सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. एकीकडे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. पण ऐन पावसाळ्यातही मंगळवेढा तालुक्यात अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी भागात अजूनही चारा छावण्या सुरू आहेत.
या भागातील शेतकरी अतिशय वाईट परिस्थितीतून जात आहे. उन्हाळ्यात राहू द्या पण निदान पावसाळ्यात तरी कृष्णा नदीचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी मंगळवेढा तालुक्यासाठी सोडून शिरनांदगी तलावासह म्हैसाळ योजनेत समाविष्ट असणाऱ्या सर्वच गावातील ओढे-नाले तलाव भरून देण्याची मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी म्हैसाळ योजनेच्या अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले व कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक यांना निवेदनाद्वारे केली आहे.
ज्याप्रमाणे उजनी जलाशयातील अतिरिक्त पाणी उजनी उजवा कालवा व डावा कालव्यामधून सोडण्याचा अतिशय महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला त्याप्रमाणे पावसाळ्यात म्हैसाळचे पाणी मंगळवेढा तालुक्याला सोडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी शैला गोडसे यांनी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज