मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पाच वर्षाच्या सत्ता उपभोगानंतर घडलेल्या सत्ता नाट्यातील पराभवाने सर्वात जास्त आमदार निवडून आणलेल्या भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली असताना देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य वारंवार भाजपला आपण सत्तेत जाणार हे स्वप्न दाखवत आहे अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची खांदेपालट केली आहे या खांदेपालटामध्ये मंगळवेढा तालुक्यासाठी निवडलेला भाजपाध्यक्ष हा शहरातीलच निवडल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत भाजपच्या सोशल मीडिया ग्रुपमधून बाहेर पडणे पसंत केले त्यामुळे अनेकांना ही निवड पचनी पडले नसल्याचे दिसत आहे .
नुकतेच भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा नेतृत्वाने पदाधिकारी निवडीत शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष निवडीत दोन्ही पदाधिकारी शहरातीलच निवडल्याने ग्रामीण भागातील प्रश्न आणि इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या आशेवर विरजण पडले आहे.
मागील पाच वर्षांच्या काळात केंद्रातील सत्तेबरोबर राज्यात सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना मंगळवेढा तालुक्यात भाजप पक्ष वाढविणे म्हणावे तसे जमले नाही तालुक्यातील अनेक रखडलेल्या प्रश्नाचसंदर्भात आ. प्रशांत परिचारक,पालकमंत्री विजयकुमार देशमुख,सहकारमंत्री सुभाष देशमुख व खा.शरद बनसोडे यांच्या माध्यमातून तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना तालुक्याचे नंदनवन करता आले असते पण अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यामध्ये बहुचर्चित 35 गावांचा पाणी प्रश्न,महात्मा बसवेश्वर स्मारक,चोखोबाचे स्मारक,बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना, दुष्काळ निधी वाटपात झालेला दुजाभाव,दुष्काळी यादीतून तालुका वगळणे यासह अनेक प्रश्नाचा सामना तालुक्यातील जनतेला करावा लागल्यामुळे ग्रामीण जनतेमध्ये नाराजी पसरली होती त्याचा फटका नुकत्याच झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मताच्या रुपात बसला आहे.
याउलट भारतीय जनता पार्टीच्या सरकारने राबविलेल्या योजना,अनेक खात्याचा सुरू केलेला ऑनलाइन कारभार, तालुक्यामध्ये सुरु असलेली महामार्गाची कामे,राबविलेली कर्जमाफी योजना,थेट जनतेतून निवडी,विविध योजनांचा थेट बँक खात्यावर लाभ ,उज्वला व आयुष्यमान भारत योजना,प्रधानमंत्री जीवन ज्योती व जीवनसुरक्षा आशा महत्वकांक्षी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर काम करणारा पदाधिकारी ग्रामीण भागातील जनतेच्या संपर्कात असणारा हवा असतो मात्र मंगळवेढा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा आणि ग्रामीण भागातील जनतेचा कधी जास्त संपर्कच आलेला कुणी पहिला नाही त्यामुळे पक्षाने केलेली कामे लोकांमध्ये मांडण्यात भाजपाचे पदाधिकारी कमी पडले,ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडली मुखमंत्र्यांनी विधानसभेला प्रचारसभा घेऊनही पक्षाची बांधणी व्यवस्थित न झाल्याने त्यांच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर पक्षाने धडा घेत भविष्यात मतदार खेचण्यासाठी शहरी आणि ग्रामीण जनतेचा समन्वय साधणारा,स्थानिक प्रश्नांची जाण असलेला पदाधिकारी निवडणे गरजेचे होते त्या दृष्टीने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी जिल्हा नेतृत्वाकडे तश्या ईच्छाही व्यक्त केल्या होत्या पण नुकत्याच झालेल्या अध्यक्ष निवडीत तालुका अध्यक्ष पद शहरातच देऊन ग्रामीण भागातील इच्छुकांच्या आशेवर पाणी पडल्याचे पहावयास मिळाले
सध्या भाजप विरोधी बाकावर आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठविणारे,सामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारे, प्रसंगी शेतकर्यांच्या बरोबर रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा चेहरा भाजप तालूकाअध्यक्ष म्हणून हवा होता परंतु जिल्हा नेत्यांनी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केल्याने आगामी काळातही भाजपच्या मतदार वाढीत सुधारणा होईल असे वाटत नसून विविध प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनाच तालुक्यात विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असे सध्या तरी चित्र दिसत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज