मधुकर मुळूक । महत्वाच्या कृषी विषयक विधेयकावर शरद पवारांची राज्यसभेतली अनुपस्थिती व त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदारांचा सभात्याग ही कृती, बरंच काही सांगून जाते. महाराष्ट्र सरकारचं भवितव्य टांगणीला लागतं की काय अशीच स्थिती आहे. खासदार संजय राऊत लोकशाही आघाडी सरकारच्या टायरमध्ये कितीही हवा भरत असले तरीही, पवार-मोदी यांची जवळीक धोक्याची घंटा वाजवतेय हे गृहित धरायला जागा आहे.
मोदी सरकारचे लोकसभेत बहुमत आहे. परंतु राज्यसभेत त्यांची दमछाक होते. कृषिविषयक बिल राज्यसभेत मंजूर करून घेण्याकरिता छोट्या-मोठ्या पक्षांची गरज मोदींना लागत असते. ‘370 कलम हटाव’ च्या वेळीही राष्ट्रवादीने अप्रत्यक्ष मोदी-शहांना मदतच केली होती. आत्ताही कृषिविषयक बिल पास होताना राष्ट्रवादीचा सभात्याग भाजपा सरकारच्या पथ्यावर पडलेला आहे.
शरद पवार – नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीची नाळ घट्ट होत चालली आहे. अर्थात त्या घट्ट मैत्रीला महाराष्ट्राची किनार लाभलेली आहे. ‘शरदराव आप एकबार ठाकरे परिवार को आसमान दिखाओ, बाकी सब काम मुझ पर छोड दो, हे सांगण्याचाच प्रकार काल राज्यसभेत झाला.
शरद पवार संसदीय कामकाजात अनुपस्थित राहात नाहीत. काल तर कृषिविषयक महत्वाचे विधेयक होते. पवार 10 वर्षे कृषीमंत्री होते. त्यांनीच या देशाचे कृषि उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवून नवा इतिहास रचला होता.
मग ऐनवेळी स्वतः अनुपस्थितीत व आपल्या पार्टीचे खासदार सभात्याग करतात, याचा अर्थ काय घ्यायचा? अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करावी हा तर नव्हता? या सभात्यागाचे दुष्परिणाम महाराष्ट्र सरकारवर होणार आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं की, राज्य सरकार पाडायाची व्यृहरचना काही प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी करत आहेत. शरद पवार मग गप्प का आहेत? त्यानंतर सारवासारव करण्यासाठी संजय राऊत धडपडताहेत. याचा अर्थ ‘सब कुछ अलबेल है’ असं वाटत नाही.
इतिहास काय सांगतो?
शरद पवार यांनी ज्यांना ज्यांना हात दिला, त्या त्या सर्व घराण्यांना एक तर निवृत्ती घ्यावी लागली किंवा राजकीय आखाड्यातून संपावं लागलं. स्व. वसंतदादा पाटील यांचं घराणं जवळपास संपल्यातच जमा आहे.
लातूरचे देशमुख घराणे असून नसल्यागत आहे. दोन आमदार, एक मंत्री एवढ्यापुरते सिमित आहे. राणे घराणे होत्याचे नव्हते झालेय. विखे – काळे – गडाख घराणे कुठेच दिसत नाही. मोहिते घराणं कधीच बरबाद झालंय. भुजबळ-नाईक पवारांच्या लेखी काडीमात्र आहेत. उरले होते ठाकरे घराणे. जोवर बाळासाहेब होते, तोवर ठाकरे घराण्याकडे कुणी तिरक्या नजरेने सुद्धा पहात नव्हते. आता ती कालची कंगना, अरे-तुरे करतेय.
पवारांनी तर रिमोट कंट्रोलच हातात घेतलंय. ठाकरे घराणे साईडींग केलं की ‘पवार ’हे एकमेव नाणे वाजेल. सोबत मोदी आले तर देशात आणि महाराष्ट्रात ‘पवार घराणे’ सत्तेत येवू शकेल. म्हणूनच राज्यसभा सभात्यागातून ‘पवार क्षेपणास्त्र’ महाराष्ट्राच्या मुळावर येईल की काय अशी शंका बळावली आहे.
शरद पवार ही अशी जादू आहे की, केव्हा काय घडेल हे सांगणं कठीण असतं. मुंबई ‘सी लिंकचा उड्डाणपूल’ तयार झाला. सर्वाना काय नाव द्यावे सुचत नव्हते. व्यासपीठावर सोनिया गांधी होत्या.
राष्ट्रवादीच्या जन्माआधी सोनिया-पवार यांची ‘परदेशी वंशाच्या बाई’ या विषयावर खडाजंगी सुरू होती. त्यातूनच बाईंनी शरद पवारांना पक्षातून निलंबित केले होते. असे असतानाही केवळ बाई खुश व्हाव्यात आणि मागे झालं ते विसरा हे सांगण्यासाठी पवारांनी ‘सि लिंक’ला राजीव गांधी यांचं नाव द्या, असं सुचवलं. कारण राजीव गांधींचा जन्म मुंबईत झाला होता.
सांगण्याचा मुद्दा एवढाच की पवारांना राजकारणाचे खाचखळगे कसे भरायचे याचे उत्तम ज्ञान असल्याने महाराष्ट्रातही भुकंप होवू शकतो.
‘पवार-मोदी’ एक झाल्यास ‘ठाकरे घराणे’ आपोआप साईडींग होवू शकते. ते होवू नये म्हणून दिल्लीच्या कुरुक्षेत्रावर ‘संजय राऊत नावाचा शिवसेना दूत’ ‘6 जनपथ’वर घिरट्या घालताना दिसतो. ‘6 जनपथ’ हे पवारांचे दिल्लीचे निवासस्थान आहे.
महाराष्ट्र सरकार ‘राम भरोसे’ चालले आहे हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.
उद्धव ठाकरे यांना सभागृहाचा, प्रशासनाचा अनुभव नसताना ते काम चांगलं करतात असं वाटत असलं तरी वाढता कोरोनाचा प्रभाव, मराठा आरक्षणाची खदखद, शेतकर्यांचा आक्रोश, तरुणांची ससेहोलपट, थंडावलेला उद्योग-व्यवसाय, चित्रपट सृष्टीवरचे ड्रग संकट, पवारांच्या न समजणार्या खेळ्या हे सर्व ठाकरे सरकारला परवडणारं नाही. “पवार क्षेपणास्त्र तयार आहे. कधीही महाराष्ट्रावर ते कोसळू शकतं.”
प्रहार/मधुकर मुळूक
संपादक -पत्रकार
दैनिक वृत्तानंद, ठाणे
9821540607
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज
खूप छान लेख लिहिला आहे सर