कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल – रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बुधवारी सायंकाळी येथे आगमन होणार आहे. उद्या गुरुवारी पहाटे मोजक्या लोकांच्या व वारकरी प्रतिनिधी म्हणून भोयर दाम्पत्याच्या उपस्थितीत महापूजा केली जाणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या सुरक्षेचा भाग म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व शासकीय विश्रामगृहाशी निगडित असणाऱ्या एकूण १३९ लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आले आहेत. त्यात सर्व जण निगेटिव्ह आले आहेत.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना यात्रेसाठी पंढरपूरला येण्यास मज्जाव करण्यात आलेला असला तरी दरवर्षीप्रमाणे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
आज दि.25 आणि 26 नोव्हेंबर असे दोन दिवस पंढरपूर शहर आणि लगतच्या नऊ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक गुरुवारी पहाटे दोन वाजून वीस मिनिटे ते पहाटे साडेतीन या वेळात श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे.
कार्तिकी एकादशी दिवशी मंदिरातील वीणेकऱ्यांच्या चिठ्ठ्या टाकून त्यांच्या पैकी एकाला श्री विठ्ठल – रुक्मिणीच्या शासकीय महापूजेवेळी उपमुख्यमंत्र्यांसोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान दिला जाणार आहे.
तो मान यंदा वीणेकरी कवडूजी भोयर व त्यांच्या पत्नी कुसुम यांना मिळाला आहे. 25 ते 27 नोव्हेंबर असे तीन दिवस भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. परंतु 28 तारखेपासून ऑनलाइन दर्शनाचे बुकिंग करून आलेल्या भाविकांना मंदिरात मुखदर्शनासाठी सोडले जाणार आहे.
चंद्रभागा नदीत स्नानासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. तथापि कोणीही वारकरी भाविक अथवा स्थानिक नागरिक नदीकडे जाऊच नये, यासाठी प्रशासनाने काटेकोर उपाययोजना केल्या आहेत.
जिल्हा तालुका आणि पंढरपूर शहराच्या हद्दीवर अशा तीन ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. पंढरपूर शहरातही जागोजागी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
असे असूनही श्री विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर आणि चंद्रभागा नदीच्या सर्व घाटांवर आषाढी यात्रेप्रमाणे बॅरेकेडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे नेहमी यात्रा काळात लाखो वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून जाणाऱ्या चंद्रभागेच्या वाळवंटात आज नीरव शांतता दिसत होती.
सार्वजनिक हिताच्या दृष्टीने, संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने 25 आणि 26 नोव्हेंबर असे दोन दिवस पंढरपूर शहरात आणि शहराच्या आजूबाजूला असलेल्या भाटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव- शिरढोण, आणि कौठाळी या ग्रामपंचायत हद्दीत साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार 144 अंतर्गत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत.
संचारबंदीतून वगळले
दरम्यान, पुढील बाबींना हा आदेश लागू होणार नाही, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. यामध्ये अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरविणारी खासगी / सरकारी रुग्णालये, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व वैद्यकीय सेवेशी संबंधित कर्मचारी आणि त्यांची वाहने, ऍम्ब्युलन्स सेवा आणि सारी, आयएलआय आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसंदर्भात सर्वेक्षण करणारे अधिकारी / कर्मचारी,
जीवनाश्यक सेवेतील आस्थापना, मंदिर समिती पंढरपूर यांच्याकडील पासधारक अधिकारी / कर्मचारी, कर्तव्यावर असणारे महसूल, पोलिस, पाणीपुरवठा, अग्निशमक, विद्युत पुरवठा विभागातील शासकीय अधिकारी / कर्मचारी, पोलिस बंदोबस्तासाठी भोजनालय, पाणीपुरवठा सुविधा पुरवणाऱ्या यंत्रणा, कार्तिक वारी कालावधीमध्ये परंपरेनुसार साजरे होणारे उत्सव यांना स्थानिक परिस्थितीनुरूप परवानगी देण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत, असे नमूद केले आहे.(source:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज