मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यात परदेशातून ८ , इतर राज्यातून एक असे ९ लोक आले तर इतर अन्य जिल्हयातून ग्रामीण भागात आलेल्या ६ हजार ९२४ नागरिकांची नोंद आरोग्य विभागाकडे करण्यात आली असून यामधील एकही कोरोनाबाधित नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
देशासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजाराने धुमाकुळ घातल्याने प्रत्येकजण आपला जीव वाचविण्यासाठी नोकरीच्या ठिकाणाहून मूळ आपल्या गावी कुटुंबाकडे परतत आहेत. आत्तापर्यंत परदेशातून ८ जण आले आहेत. त्यापैकी एकजण राजस्थानमधून आल्याने त्याला ताप , सर्दी असल्याने केगाव येथील होम क्वारंटाईन्ड ठेवण्यात आले आहे.
तर दुबई , मलेशिया , सौदे अरेबिया , आबूधाबी , कतार , उजबेकिस्तान आदी देशामधून आलेल्या ८ पैकी ६ जणांना होम क्वारंटाईन्ड तर अन्य दोघांना मंगळवेढा येथील मुलींच्या वसतीगृहात असलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे पत्ते व मोबाईल नंबर प्रशासनाने नोंदवून घेतल्याने अधूनमधून त्यांच्याकडे आरोग्याबाबत चौकशी केली जात आहे.
जीवाच्या भितीपोटी पुणे, सांगली,सातारा , कर्नाटक राज्य , उस्मानाबाद , कोल्हापूर या जिल्हयातून ६ हजार ९२४ नागरिक आपल्या मूळ गावी परतले आहेत. प्राथमिक आरोग्यकेंद्र निहाय आकडेवाडी पुढीलप्रमाणे – आंधळगांव प्राथमिक आरोग्य केंद्र १५३३ नागरिक , सलगर बु . प्राथमिक आरोग्य केंद्र १०२१ , भोसे प्राथमिक आरोग्य केंद्र १६३२ , बोराळे प्राथमिक आरोग्य केंद्र १२५४ , मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र १४८४ असे एकूण ६९२४ नागरिक विविध ठिकाणाहून बाहेर गावाहून आले आहेत.
या सर्वांच्या नोंदी प्रत्येक गावच्या ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडे करण्यात आल्या आहेत . या सर्वांना तपासून सर्दी ,ताप , खोकला नसल्याची खात्री करून त्यांना घरी पाठविण्यात आले.
मंगळवेढा शहरात ८ लोकांची टिम मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केली असून या टिमने शहरात ४०७ नागरिक बाहेर गावाहन मंगळवेढा शहरात दाखल झाल्याची नोंद नगरपालिकेकडे घेण्यात आली आहे. मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात शहरातील १५२ नागरिकांना तर ग्रामीण भागातील २२० असे एकूण ३७२ लोकांना तपासण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. प्रमोद शिंदे यांनी दिली.
दरम्यान मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात दि . २७ मार्च अखेर कोरोनाबाधित एकही रुग्ण सापडला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले . यामुळे शासकीय यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला आहे . पोलिस प्रशासन , आरोग्य खाते , आशा वर्कर ,अंगणवाडीसेविका , नगरपालिका कर्मचारी आदी खबरदारी म्हणून सातत्याने अलर्ट रहात असल्याचे चित्र आहे.
शुक्रवारी दुपारी २ वा . कर्नाटक राज्यातून १३ ट्रक व कंटेनर भरून नागरिक मंगळवेढा तालुक्यात प्रवेश करीत होते. सीमाबंदी असल्याने पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी या सर्वांना मरवडे येथील चेक पोस्टवर रोखले. हे सर्व लोक राजस्थान व हरियाना राज्यात जात असल्याचे सांगण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज