मंगळवेढा टाईम्स न्युज ।
महायुती सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पंढपूरमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना प्रमाणपत्रही वाटप करण्यात आले आहे.

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ च्या पहिल्या यादीतील 17,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 31 जुलैपुर्वी रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या पंढरपूरच्या दौऱ्यावर आहे. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ मधील पात्र शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्रांचे वितरण केले.

तसंच यावेळी कर्जमुक्त झालेल्या या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने नव्याने देण्यात आलेल्या पीक कर्जाच्या धनादेशांचेही वाटप करण्यात आले.

“31 जुलै पूर्वी सर्व कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसंच, यामध्ये राज्यातील 70 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

त्याचबरोबर शेतकऱ्यांचं 48 हजार कोटींचं वीजबील माफ केलं, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. सध्या राज्यातल्या 75 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळतेय. डिसेंबरपर्यंत 100 टक्के 12 तास वीज मिळेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय.
कर्जमुक्ती योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी
शंकर माळी (रा. खर्डी)
सुभद्रा जाधव (रा. सिद्धेवाडी)
सुभाष बनसोडे (रा. सिद्धेवाडी)
खुशाबा दबडे (रा. गोपाळपूर)
पंडा रोंगे (रा. खर्डी)
ज्ञानोबा पिसे (रा. तावशी)
दादासो यादव (रा. तावशी)

५६ लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार
दरम्यान, राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ अंतर्गत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळविण्यासाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.

योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठविण्यात येणार आहेत. तसंच ग्रामपंचायत कार्यालयं, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्येही लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. आधार क्रमांक किंवा या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक राहणार असून, राज्यातील सुमारे ३२ हजार ‘आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. ही योजना केवळ कर्जमुक्ती पुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून नव्या उमेदीने शेतीसाठी बळ देणारी योजना असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












