मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
उजनी धरणात मिसळणारा दौंड येथील विसर्ग मोठ्या प्रमाणात घटला आहे. दौंड येथून ११ हजार ७१९ क्युसेक विसर्ग सोमवारी सायंकाळी ६ वाजता सुरू होता. रविवारी सायंकाळी १५ हजार २३३ क्युसेक होता.
धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी ‘उजनी’तून सोमवारी दुपारी आणखी ५ हजार क्युसेक विसर्ग वाढवून भीमा नदीत ३० हजार करण्यात आला आहे. रविवारी २५ हजार क्युसेक होता.
सोमवारी सायंकाळी उजनी धरणाची पाणीपातळी ७५.६७ टक्के आहे. रविवारी सायंकाळी धरणाची पाणीपातळी ७६.९८ टक्क्यांपर्यंत होती. २ टक्के पाणी तळी कमी करण्यात यश मिळवले आहे.
भीमा खोऱ्यातील पाऊस थांबल्यामुळे बंडगार्डन येथील विसर्गात देखील मोठी घट झाली आहे.
पंढरपूर आषाढी वारीमुळे उजनीची पाणीपातळी स्थिर ठेवण्याचे प्रयत्न उजनी धरण व्यवस्थापन करीत आहे. सध्या धरणात एकूण १०४.२० टीएमसी पाणीसाठा असून ४०.५४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा धरला आहे.
उजनीतून भीमा नदीत वीजनिर्मिती १ हजार ६०० क्युसेक, उजनी मुख्य कालवा ५०० क्युसेक, भीमा-सीना जोडकालव्यातून ७०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.
भीमेत विसर्ग वाढला; बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती पंढरीचा दगडी पूल उद्या पाण्याखाली जाणार
उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढल्याने मंगळवारी भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली जाऊन भीमा नदी दुथडी वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
विसर्ग वाढल्यामुळे पंढरपूर येथील चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्यात जाणार आहेत. वाढता विसर्ग, आषाढी यात्रा सोहळ्याच्या पार्शवभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे.
काही दिवसांपासून नीरा व भीमा खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे वीर धरणातून नीरा नदीपात्रात ६,५३७ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. त्याचवेळी उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये ३१,६०० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. नीरा व भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे अनियंत्रित विसर्ग नदीपात्रामध्ये येत आहे.
त्यामुळे सद्य:स्थितीतील दोन्ही धरणांतून येणारा विसर्ग पाहता भीमा नदीपात्रामध्ये ४० हजार क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग राहणार आहे. या विसर्गामुळे एक महिन्यात दुसऱ्यांदा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. पंढरपूर येथील जुना दगडी पूलही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
आषाढी यात्रेनिमित्त येणारे भाविक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भीमा नदीवरील बंधाऱ्यांवरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाने केली आहे.
भीमा नदीची पाणीपातळी वाढल्याने येथील चंद्रभागा नदी पात्रात असलेली सर्व मंदिरे पाण्याने वेढली जाणार आहेत. तसेच पाण्याची पातळी घाटापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात स्नान करणाऱ्या भाविकांना सावधानता बाळगावी लागणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज