टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी यात्रा काळात भाविकांनी पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पंढरपुरातील जवळपास १२०० मठ व धर्मशाळेत दाखल झालेल्या वारकऱ्यांनी मठात राहू नये, अशा नोटिसा पोलिसांनी बजावल्या आहेत.
यावर यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांना पोलिसांनी मठाबाहेर काढू नये. अन्यथा वारकरी पोलिसांविरोधात एकत्रित येवून रस्त्यावर उतरतील, असा गंभीर इशारा ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी पंढरपुरात दिला.
माघी यात्रेच्या दरम्यान पोलिस आणि वारकरी असा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी यात्रा रद्द केली आहे. त्यातच सोमवार (ता. २२ फेब्रुवारी) मध्यरात्रीपासून ते मंगळवार (ता.२३ फेब्रुवारी) मध्यरात्रीपर्यंत पंढरपूर शहरासह परिसरातील दहा गावांमध्ये संचार बंदी लागू केली आहे.
अशातच विविध मठामध्ये वास्तव्यास असलेल्या वारकऱ्यांना पोलिसांनी मठा बाहेर काढण्याची मोहिम सुरू केली आहे. पोलिसांच्या या मोहिमेला वारकऱ्यांनी विरोध केला आहे.
मुळात प्रशासनाने यापूर्वीच संचार बंदी लागू करणे आवश्यक होते. ऐनवेळी संचार बंदी लागू केल्याने वारकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. वारकऱ्यांना संताप होईल. अशी कोणतीही गोष्ट पोलिसांनी करू नये अन्यथा वारकरी पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर येतील, असा इशारा ही त्यांनी दिलाय.
प्रसासनाच्या आवाहनानंतर राज्यभरातून येणाऱ्या दिंड्या पंढरपूरकडे येण्याच्या एेवजी जागेवरच थांबल्या आहेत. ज्या दिंड्या अथवा वारकरी यापूर्वीच पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना पंढरपुरात राहू द्यावे असे आवाहन बंडातात्या यांनी पोलिस प्रशासनाला केले आहे.
नव्याने येणाऱ्या भाविकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिस रोखत असतील तर त्याला आमचा आक्षेप नाही. मात्र, जे आधीपासून आले आहेत, त्यांना बाहेर काढल्यास उग्र आंदोलन होईल, असा इशारा बंडातात्या यांनी दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी शहरातील सर्व मठ व धर्मशाळांना यापूर्वीच नोटीस बजावून वारकऱ्यांना मठात ठेवून घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतर बंडातात्या यांनी यास आक्षेप घेतला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज