हिंदुत्वावर बोलण्याचा यांना बोलण्याचा अधिकार आणि नैतिकता नाही. यांचे 56 आमदार नरेंद्र मोदींच्या नावावर आलेत, नाहीतर 25 पण आले नसते. बेईमानी करून, हिंदुत्वाला मूठ माती देऊन त्यांनी पद मिळवलं असा माझा आरोप आहे, अशी टीका भाजप नेते नारायण राणेंनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही. एवढेच नव्हे तर हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठीही लायक नाही, अशी घणाघाती टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली.
दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे ताळमेळ नसलेलं, निर्बुद्ध आणि शिवराळ बरळणं होतं. मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीने कसं बोलावं, याचं उद्धव ठाकरेंना भान नाही. उद्धव ठाकरे म्हणजे पुळचट माणूस आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यात नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना बेडूक आणि बेडकाची पिल्ले, अशा अप्रत्यक्ष शब्दांत टोले लगावले होते.या टीकेला नारायण राणे यांनी आज मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत प्रत्युत्तर दिले.
कालचा दसरा मेळावा म्हणजे 47 शिवसैनिकांमध्ये झालेली भव्य सभा होती, असा उपरोधिक टोला राणेंनी लगावला. आजवर महाराष्ट्रात जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या कार्याने आणि भाषणशैलीने देशात राज्याची प्रतिष्ठा वाढवली. याला सध्याचे मुख्यमंत्री अपवाद आहेत. तेच उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर टीका करतात.
मोदींच्या धोरणावर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. त्यांनी महाराष्ट्राचा कारभार सांभाळावा, असे नारायण राणे यांनी सांगितले.
कालच्या भाषणात एकाही विकास कामाचा उल्लेख नाही, कोरोनाचा उल्लेख नाही. जवळपास 43 हजार रुग्ण महाराष्ट्रात मृत्यूमुखी पडले. याची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर येत नाही का? असा सवालही नारायण राणेंनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. मुख्यमंत्री पदाला हा माणूस लायक नाही.राज्यात 16 हजार कोटींचे उद्योग आणल्याचा उल्लेख केला तो फक्त कागदावर आहे, बेकारीचा उल्लेखच नाही, असं नारायण राणेंनी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या पुत्राला क्लीन चिट दिलीय, पण आजही म्हणतो सुशांत सिंग राजपूतचा खून झाला आहे. त्यातील आरोपी गजाआड जातील, त्यात एक मंत्री, त्यांचा मुलगा पण असेल. सीबीआयने अजून केस बंद केलेली नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज