टीम मंगळवेढा टाईम्स ।
गेल्या तीन वर्षांपासून वाळू लिलाल झालेले नाही, त्यामुळे मंगळवेढा शहरासह तालुक्यातील शासकीय प्रधानमंत्री आवास, रमाई आवास व घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी यांनी करावी.
रखडलेल्या बांधकामांना वाळू उपलब्ध होण्यासाठी वाळू लिलाव जाहीर करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पर्यावरण व अन्य बाबींची मंजुरी रखडल्याने गेल्या तीन वर्षांपासून वाळू लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांची बांधकामे रखडली आहेत.
सध्या नंदुरबार येथील रॉयल्टीची १२ हजार रुपये ब्रासची वाळू घेऊन गोरगरिबांना घर बांधणे आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यासह जिल्ह्यातील हजारो घरकुलाचे काम ठप्प झाले आहे.
शासनाच्या आदेशानुसार पाच ब्रास वाळू मोफत देण्याच्या निर्णयानुसार तालुक्यातील भीमा व माण नदीवरून घरकुल धारकांस पाच ब्रास वाळू तात्काळ उपलब्ध करून द्यावी.
त्यामुळे खोळंबलेली घरकुलाची कामे मार्गी लागतील, गरजूंना त्यांची हक्काची घरे मिळतील असेही घुले यांनी निवेदनात म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज