टीम मंगळवेढा टाइम्स ।
देवगड किंवा रत्नागिरी हापूसच्या नावाखाली दक्षिण भारतातून येणाऱ्या कमी प्रतिच्या आंब्यांची विक्री करण्याचे प्रमाण महाराष्ट्रात वाढीस लागले आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने मात्र अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. बनावट हापूस आंब्याच्या जवळपास 42 पेट्या जप्त करण्यात आल्या आहेत.
कर्नाटक हापूस म्हणून ओळखला जाणारा हा आंबा कोकणचा हापूस म्हणून विकला जात असल्याने ग्राहकांबरोबरच कोकणातील शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
त्यामुळे इथून पुढे अशी फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाईदेखील केली जाईल, असे बाजार समितीच्या प्रशासकांनी म्हटले आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कारवाई तर करण्यात येत आहेच. मात्र ग्राहकांनादेखील अशा फसव्या आंब्याविषयी माहिती असणे गरजेचे आहे.
फसव्या आंब्यांच्या या बाजारपेठेत ग्राहकांनी अस्सल कोकणी हापूस कसा ओळखावा, हे आंब्यांच्या व्यापाऱ्याकडून आणि प्रशासकांकडूनच जाणून घेतले आहे.
येथील व्यापारी अनिरुद्ध भोसले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ विभागाचे विभागप्रमुख बाबा बिबवे यांनी याविषयीची माहिती दिली.
चांगल्या गुणवत्तेच्या हापूस आंब्याला एक नैसर्गिक सुंगध असतो. त्या सुंगधामुळे तो दूरवरुनही पटकन ओळखता येतो. नैसर्गिकरित्या गवताच्या अढीमध्ये पिकवलेल्या आंब्याच्या घमघमाट दूरपर्यंत पसरतो.
इतर भागातून येणारे आंबे जे हापूस आंब्यासारखे दिसतात मात्र त्याला अजिबात गंध नसतो किंवा फार क्वचित येतो. हे आंबे रासायनिक पद्धतीचा वापर करुन पिकवलेले असल्याने ते सुगंध देत नाहीत.
नैसर्गिकरित्या पिकवलेले आंब्यांना स्पर्श केल्यानंतर ते मऊ आणि मुलायम असल्याचे जाणवतात. तर रासायनिकरीत्या पिकलेले आंबे पिवळे, पण कठोर असतात.
नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा रंग हा पिवळसर आणि फिकट हिरवा असतो. तर रासायनिकरीत्या पिकलेले आंबे एकसारख्याच रंगाचे दिसतात.
पिकलेल्या हापूस आंब्याची साल आपण सहजरित्या हाताने काढू शकतो.
तसेच या सालीला आंब्याचा गर लागत नाही. हापूस आंब्याचा वास आणि त्याचा केशरी गर यावरून सहजरित्या ओळखू शकतो.
एका मोठया भांड्यात पाणी घेऊन त्यात आंबा बुडवा, जर आंबा बुडाला तर तो नैसर्गिकरित्या पिकलेला आहे. मात्र जर आंबा तरंगत राहिला तर तो रसायने वापरुन पिकवलेला आहे, असेही काहीजण ओळखतात.
शिवाय जर आपली नजर चांगली असेल तर आंब्याच्या पेटीतील वर्तमानपत्रातूनही त्याची ओळख स्पष्ट होते. त्यात कुठले वर्तमानपत्र वापरले आहे त्यावरून सुद्धा तो आंबा कुठल्या भागातून आला आहे हे कळते.(स्रोत:TV9 मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज