टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात 1 जूनपासून हॉटेल, मद्यविक्रीसह अन्य दुकानांची वेळ सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव आहे. परंतु, त्याठिकाणी पार्सल सेवेवरच भर राहील अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनातील विश्वसनिय सूत्रांनी दिली.
कोरोनाच्या काळातील कडक निर्बंधांमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यामुळे निर्बंधात सुट द्यावी, असा वित्त विभागाचा आग्रह असून कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने निर्बंधात शिथिलता द्यायला आपत्ती व्यवस्थापनानेही तयारी दर्शविली आहे.
राज्य सरकारला दरवर्षी तीन लाख 36 हजार कोटींपर्यंत महसूल मिळतो. त्यात मद्यविक्रीतून मिळणाऱ्या 14 हजार कोटींचा समावेश आहे. गतवर्षी मद्यविक्रीतून राज्याला साडेपंधरा हजार कोटींचा महसूल मिळाला होता. तरीही, जवळपास 90 हजार कोटींहून अधिक तुट सोसावीच लागली.
आता दरमहा राज्याच्या तिजोरीत सरासरी 40 हजार कोटींचा महसूल येणे अपेक्षित आहे. मात्र, आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर झाल्याने उत्पन्नावर पुन्हा परिणाम झाला.
कोरोनाचे संकट, अवकाळी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शनच्या खर्चामुळे राज्याच्या डोक्यावरील कर्जदेखील वाढले आहे. या पार्श्वभूमीवर उत्पन्नात वाढ होण्यासाठी आता निर्बंधात शिथिलता गरजेची आहे, असे वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्रिमंडळाने 15 जूनपर्यंत कडक लॉकडाउन वाढविताना निर्बंध शिथिलतेचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भात नवी नियमावली तयार केली जात आहे.
नव्या नियमावलीतील संभाव्य बाबी…
मद्यविक्रीची दुकाने उघडण्यास परवानगी; त्याच ठिकाणी बसून मद्यपान करण्यावर बंदी,हॉटेल उघडण्यास मंजुरी असणार, पण लोकांना हॉटेलमधून घेऊन जाता येईल पार्सल जेवण
मुंबई लोकल बंद ठेवण्यात येईल; दुकानांची वेळ सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत असणार, ई-पासशिवाय आंतरजिल्हा प्रवास करता येणार नाहीच; 15 जूननंतर जिल्हाबंदी उठविण्याचा निर्णय
रूग्ण कमी असलेल्या जिल्ह्यांअंतर्गत सार्वजनिक वाहतूक 50 टक्क्यांच्या निर्बंधात सुरु राहील,शहर-जिल्ह्यातील ज्या भागात रूग्णसंख्या अधिक आहे, अशा ठिकाणी निर्बंधात शिथिलता नसेल.(स्रोत:सकाळ)
कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून कडक निर्बंधात आता सवलती मिळतील. सर्वच दुकाने सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी असावी, असा प्रस्ताव आम्ही दिला आहे. मुंबई लोकल आताच सुरू होणार नाही. त्यासंदर्भात नवी नियमावली तयार होत असून 31 मेपर्यंत मंत्री महोदय त्याची घोषणा करतील. – श्रीरंग घोलप, संचालक, आपत्ती व्यवस्थापन, मुंबई
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज