सुरज फुगारे । मंगळवेढा तालुक्यात खरीप व बागायत क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी बहुतांश राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांकडून अडवणूक केली जात असल्यामुळे या बँकांवर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार स्वप्नील रावडे यांना निवेदन देण्यात आले.
मागील दोन-चार वर्षात दुष्काळामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला होता.अशा परिस्थितीत शासनाच्या महात्मा फुले कर्जमाफी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून बहुतांश शेतकरी कर्जमुक्त झाले.
परंतु त्यांना नव्याने कर्ज वितरित करण्यासाठी बॅंकांकडून अडवणूक केली जात आहे, तर प्रशासनाने पीक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना दिल्या होत्या. परंतु ऑनलाइन अर्ज करूनदेखील बॅंकांकडून अजूनही बहुतांश शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यात आले नाही.
वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली जात आहे. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक करू नये, असे शासनाचे आदेश असताना अनेक बॅंका शेतकऱ्यांना पीककर्ज देताना नाहक त्रास देत आहेत. या बॅंकांवर कारवाई न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
तालुक्यातील एका बॅंकेच्या माचणूर व अरळी येथील शाखेत शेतकऱ्यांनी कर्ज मागणी केल्यानंतर तीन महिने शेतकऱ्यांकडून विविध कागदपत्रांची मागणी करण्यात आली. कोरोना आजाराची भीती असताना शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तताही केली.
तरीही शेवटी सी-बिल खराब आहे आदी वेगवेगळी कारणे सांगून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देण्यात आला. याशिवाय अनेक राष्ट्रीयीकृत बॅंका व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून पीककर्ज मिळावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज केले. या अर्जातील किती शेतकऱ्यांना कर्ज वितरित केले व किती शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले याची चौकशी करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
तर तालुक्यातील काही अशिक्षित शेतकरी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी गावालगत असलेल्या बॅंकेत हेलपाटे मारू लागले पण बॅंकेचे अधिकारी मात्र या शेतकऱ्यांना अपेक्षित सहकार्य करत नाहीत. बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पीककर्ज वाटपाचे 80 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात किती लोकांना याचा लाभ मिळाला याची देखील चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. राहुल घुले, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, शहराध्यक्ष हर्षद डोरले, नंदूर शाखाध्यक्ष शंकर संगशेट्टी, महादेव येडगे, राजेंद्र चव्हाण व तक्रारदार शेतकरी उपस्थित होते.
Obstruction of farmers by banks for giving peak loans; Swabhimani’s statement to tehsildar for action against banks
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज