टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सचिन घुले यांच्यासह सत्ताधारी गटाच्या पाच तर विरोधी स्वाभिमानी गटाचे प्रमुख संजय पवार यांच्यासह चार सदस्यांविरोधात निवडणूक खर्च विहीत पद्धतीने व नमुन्यात सादर न केल्यामुळे संबंधित सदस्यांना अपात्र करणेबाबत परस्पर विरोधात तक्रारी दाखल झाल्याने
त्या 9 सदस्यांवर कुठली कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले असून पवार व तांबोळी गटातील राजकीय स्पर्धा यानिमित्ताने टिपेस पोहोचली आहे.
मागील पंचवार्षिक कालावधीत केलेल्या विकास कामांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित भालके गटाच्या स्वाभिमानी परिवाराचे प्रमुख संजय पवार यांची राजकीय घौडदौड रोखण्यासाठी तालुक्याच्या राजकीय पटलावरील
परिचारक, काळुंगे, ढोबळे,शेतकरी संघटना तसेच स्थानिक लतिफ तांबोळी गटाने एकत्र येत गावविकास आघाडीच्या माध्यमातून बहुमत मिळवले होते.
या निवडणूकीतील सत्ताधारी गटाच्या सरपंच, उपसरपंच यांच्यासह अन्य तीन सदस्यांनी विहीत रीत व नमुन्यात खर्च सादर केला नसल्याची तक्रार युवा आघाडीचे कार्यकर्ते बालाजी पवार यांनी दाखल केली होती.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी या हेतूने राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या संहितेप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करताना उघडण्यात आलेल्या बँक खात्यावरुन निवडणूक खर्च करणे बंधनकारक असताना या नियमांचे उल्लंघन झाले असून या पाच सदस्यांनी रोखीने खर्च केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आहे.
या तक्रारीच्या अनुषंगाने सोशल मिडीयातून अनेकदा कलगीतुरा रंगला होता. या तक्रारीमुळे गावच्या निकोप राजकीय परंपरेला तडा जात असून पराभव पचवता न आल्याने अशा तक्रारी केल्याचा आरोप सत्ताधारी गावविकास आघाडीने केला होता,
तर २०१२ मध्ये तिसऱ्या आघाडीच्या सदस्यांना अपात्र करण्यासंदर्भात लतिफभाई तांबोळी यांनी तक्रार दाखल करुन ही सुरुवात करुन दिल्याची आठवण विरोधकांनी त्यांना करुन दिली होती.
या संदर्भात सरपंच सचिन घुले यांनी गावची प्रगल्भ राजकीय परंपरा विरोधक पायदळी तुडवत असून मिळेल तेवढया कालावधीत चांगले काम करणार असून आमच्या विरोधात तक्रारी झाल्या असल्या तरीही आम्ही विरोधकांवर अशा कुठल्याही हरकती घेणार नसल्याचा निर्वाळा दिला होता.
सत्ताधारी गटाच्या पाच सदस्यांविरोधातील सुनावणी 7 डिसेंबर रोजी पूर्ण झाली असून जिल्हाधिकार्यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते .
मात्र सत्ताधारी गावविकास आघाडीचे मिस्टर उपसरपंच सिद्धेश्वर सुर्यवंशी यांनी विरोधी स्वाभिमानी गटाच्या चार सदस्यांविरोधात देखील अशीच तक्रार दाखल केल्याने सुरुवातीला तक्रारीकडे टाईमपास हिणवणार्यांना देखील या हरकतीचे गांभीर्य लक्षात आल्यामुळे ही तक्रार दाखल झाल्याची चर्चा गावात रंगली आहे.
या संदर्भातील पहिली सुनावणी नुकतीच झाली असून पुढे होणाऱ्या सुनावण्यांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या सर्व घडामोडीमुळे उपसरपंचपदी सौ.रेश्मा शिवशरण यांची वर्णी लागली असून सरपंच सचिन घुले यांनीही आपल्या पदाचा राजीनामा सभापती सौ.प्रेरणा मासाळ यांच्याकडे सुपुर्द केला असून आगामी घडामोडींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
यानिमित्ताने राष्ट्रवादी ओ.बी.सी. सेलचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी लतिफभाई तांबोळी यांच्या राजकीय संपर्काचा कस लागला असून गावविकास आघाडीच्या सदस्यांना तांबोळी यांच्यासह भाजपाची मोठी राजकीय ताकद मिळत आहे.
तर राष्ट्रवादीचेच जनरल सेक्रेटरी संजय पवार हे प्रतिकूल राजकीय परिस्थितीत प्रशासकीय कौशल्याच्या बळावर बाजी पलटविण्यात माहीर असून त्यांच्या देखील नैपुण्याचा कस लागला आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार – तांबोळी गटातील हे राजकीय शीतयुद्ध हुलजंती गटातील अनेक समिकरणांची नांदी ठरणार यात शंका नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज