टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार भगीरथ भालके यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन सदस्यपदी भालकेंची नियुक्ती करण्यात आली आहे.
सहा पदे राष्ट्रवादीकडे, तर चार शिवसेना आणि चार काँग्रेसकडे सोपवण्यात आली आहेत. सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी नियुक्त्या केल्या. मात्र त्यामुळे राष्ट्रवादीचे निष्ठावंत नेते नाराज असल्याची चर्चा आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला.
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे सुपुत्र भगीरथ भालकेंना राष्ट्रवादीने तिकीट दिलं होतं. राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे 3 हजार 733 मतांनी विजयी झाले.
भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. त्यावेळी बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व 18 संचालकांनी भगीरथ भालके यांच्या नावाला पसंती दिली होती.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जेव्हा भालके कुटुंबियांना भेटण्यासाठी सरकोलीला गेले होते, तेव्हाच पवारांनी भगीरथ भालके यांना संधी देण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वच संचालकांनी भगीरथ भालके यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची बिनविरोध निवड केली होती.
भगीरथ भालके हे गेल्या दहा वर्षांपासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात काम करत आहेत. साखर कारखाना अडचणींतून बाहेर काढण्याची जबाबदारी भगीरथ भालकेंवर आहे.(स्रोत:tv9मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज