टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर राज्याच्या अर्थसंकल्पात नमामी चंद्रभागा तीर्थक्षेत्र विकास आराखडा व मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी ठोस आर्थिक तरतूद केली नाही . त्यामुळे या अर्थसंकल्पाने पंढरपूर व मंगळवेढेकरांची निराशा केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
दरम्यान, श्री विठ्ठल मंदिर जीर्णोद्धारासाठी ७३ कोटींची तरतूद केली आहे. या व्यतिरिक्त अन्य कामांसाठी ठोस तरतूद नाही.
चंद्रभागा प्रदूषणमुक्तीसाठी देवेंद्र फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या नमामि चंद्रभागा अभियानाला पुरेसा निधी आजवर मिळालेला नाही. त्यामुळे ही योजना कागदावरच आहे.
सध्या चंद्रभागा नदीची मोठी दूरवस्था झाली आहे. २००८ मध्ये संत तुकाराम महाराज चतुजन्मशताब्दी निमित्त जाहीर केलेल्या पंढरपूर, देहू, भंडारा डोंगर, आळंदी परिसर विकास आराखड्यास आठ वर्षांत भरीव तरतूद झालेली नाही.
त्यामुळे अनेक कामे केवळ कागदावर आहेत. या अंदाजपत्रकात तरतूद होते का याकडे लक्ष लागले होते. मात्र साफ निराशा झाली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात कळीचा मुद्दा असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी आर्थिक तरतूद केल्याचेही स्पष्ट झाले नाही.
जलसंपदा विभागाच्या अपूर्ण प्रकल्पांसाठी आर्थिक तरतूद असली तरी त्याचा प्राधान्यक्रम पूर्वीच्या प्रकल्पांसाठी आहे या योजनेला लाभ मिळण्याची शक्यता धूसर आहे.
निराशाजनक अर्थसंकल्प : आ.आवताडे
अर्थसंकल्प अतिशय निराशाजनक आहे. नमामि चंद्रभागा, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, महात्मा बसवेश्वर स्मारक, मंगळवेढा उपसा सिंचन योजना यासाठी कसलीही आर्थिक तरतूद केली नाही.
केवळ निधी देऊ, अशा शब्दांचे पोकळ आश्वासन दिले जाते. मागील वर्षी पाणीपुरवठा योजनेच्या मंजूर निधीत १० टक्के कपात करण्यात येणार होती.
मी ती चूक दाखवून दिल्यामुळे तेवढी कपात केली नाही. बाकी या अर्थसंकल्पात पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याला पूर्णपणे डावलले आहे. दोन्हीही तालुक्यांची उपेक्षा केली आहे.– समाधान अवताडे, आमदार , पंढरपूर-मंगळवेढा
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज