टीम मंगळवेढा टाईम्स ।
ऑस्ट्रेलियाच्या १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व लोकेश राहुल स्वस्तात माघारी परतले. पण, विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारताच्या विजयाचा पाया रचला.
सूर्यकुमार व विराट या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर हार्दिक पांड्याने त्याचे काम केले. भारताने ०-१ अशा पिछाडीवरून ही मालिका २-१ अशी जिंकताना विश्वविक्रम केला.
कॅमेरून ग्रीनचा तडाखा पाहून ऑस्ट्रेलिया आज धावांचा डोंगर उभा करेल असेच चित्र होते. पण, अक्षर पटेल व युजवेंद्र चहल यांनी भारताला पुनरागमन करून दिले.
त्यात ग्लेन मॅक्सवेलच्या विकेटने सामन्यात थोडासा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. अखेरच्या काही षटकांत टीम डेव्हिडने भारतीय गोलंदाजांना धु धु धुतले आणि तगडे आव्हान उभे केले.
कॅमेरून ग्रीनने २१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा चोपल्या. टीम डेव्हिड २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून ५४ धावांवर माघारी परतला. सॅम्स २८ धावांवर नाबाद राहिला.
भुवीने ३ षटकांत ३९ ( १ विकेट) धावा, जसप्रीतने ४ षटकांत ५० धावा दिल्या. अक्षरने ३३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. युजवेंद्र चहलनेही २२ धावांत १ विकेट घेतली.
प्रत्युत्तरात लोकेश राहुल ( १) पहिल्याच षटकात झेलबाद झाला. यष्टिरक्षक मॅथ्यू वेडने उत्तुंग उडालेला चेंडू अप्रतिमरित्या टिपला. रोहित शर्माने पुन्हा खणखणीत षटकार मारून मागच्या सामन्यातील अफलातून खेळीची झलक दाखवली.
पण, पॅट कमिन्सने त्याला १७ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. सूर्यकुमार यादव व विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरताना सुरेख फटकेबाजी केली. या दोघांनी ३२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली.
त्यांच्या फटकेबाजीमुळे भारत विजयाच्या नजीक येत होता.सूर्यकुमारने खणखणीत षटकार खेचून २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. विराट व सूर्यकुमारने ६० चेंडूंत १०० धावांची भागीदारी पूर्ण केली.
१४व्या षटकात कॅमेरून ग्रीनने हे वादळ रोखले. ३६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकार खेचून सूर्यकुमार ६९ धावांवर झेलबाद झाला. भारताला १३४ धावांवर तिसरा धक्का बसला.
सूर्यानंतर विराटनेही ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हार्दिक पांड्यानेही त्याला तोडीस तोड साथ देताना कांगारूंना हतबल केले. भारताला १८ चेंडूंत ३२ धावा करायच्या होत्या.
पॅट कमिन्सने १८व्या षटकात ११ धावा दिल्या आणि भारताला अखेरच्या दोन षटकांत २१ धावा करायच्या होत्या. हार्दिकने १९व्या षटकात हेझलवूडला पहिलाच चेंडू षटकार खेचला.
पण, विराटने दोन डॉट चेंडू खेळले अन् पाचव्या चेंडूवर मॅक्सवेलने चौकार अडवला. या षटकात १० धावा आल्याने आता ६ चेंडू ११ धावा भारताला करायच्या होत्या. विराटने पहिलाच चेंडू षटकार खेचला.
आता भारताला ४ चेंडूंत ५ धावा हव्या होत्या आणि दिनेश कार्तिकने एक धाव घेतली. हार्दिकने चौकार खेचून विजय पक्का केला.
हार्दिक १६ चेंडूंत २५ धावांवर नाबाद राहिला. कॅलेंडर वर्षात सर्वाधिक २१ ट्वेंटी-२० सामने जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला. त्यांनी पाकिस्तानचा २० विजयाचा विक्रम मोडला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज