मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
राज्यात 20 ऑगस्ट 2023 पर्यंत संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदानकेंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या नावांची पडताळणी करणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे.
मतदारांच्या भेटीमध्ये नेमकं काय होणार
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या या भेटींमध्ये मतदारांचे वैयक्तिक तपशील, पत्ता आणि छायाचित्रांची पडताळणी करतील. मृत आणि स्थलांतरीत मतदार, दुबार नोंदणी असलेले मतदार, मतदारांचाही शोध घेतील.
तसेच मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया करतील. यासोबतच नव मतदार, तृतीयपंथी आणि विमुक्त जाती भटक्या जमातीतील मतदार, देहव्यवसाय करणाऱ्या महिला मतदारांचा शोध घेऊन त्यांची आणि मतदार यादीत नाव नसलेल्यांची नोंदणी करण्याचे कामही या काळात केले जाणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.
18 वर्ष पूर्ण झालेल्यांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी
या उपक्रमामुळे राज्यातील मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचे आणि अद्ययावतीकरणाचे काम सुलभ होऊ शकणार आहे. हा उपक्रम म्हणजे आपण आपल्या मताधिकारापासून वंचित राहू नये, याची सुनिश्चिती करण्याची नागरिकांसाठी मोठी संधी आहे. त्यामुळं जेव्हा हे अधिकारी आपल्या घरी येतील तेव्हा नागरिकांनी आपले स्वतःचे, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत की नाहीत हे तपासून घ्यावे.
वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत पण अजूनही मतदार नोंदणी केलेली नाही अशांची मतदार नोंदणी करुन घ्यावी असं आवाहन देशपांडे यांनी केलं आहे. मतदार यादीतील आपले वैयक्तिक तपशील, पत्ता यात काही दुरुस्त्या असतील तर त्यासाठीचे अर्ज भरुन द्यावेत. लग्नानंतर नाव बदललेल्या स्त्री मतदारांनी आपली नावे बदलून घ्यावीत. स्थलांतरीत झालेल्यांनी नव्या पत्त्याची नोंद करून घ्यावी, असेही आवाहन देखील देशपांडे यांनी केलं आहे.
मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावं
मतदारांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होणार आहे. त्यामुळं सर्व मतदारांनी त्यांच्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन देशपांडे यांनी केलं आहे. तसेच त्यांना विनासंकोच आवश्यक ती माहिती आणि दस्तऐवज द्यावेत, असे आवाहनही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज