मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या भयामुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद आहेत.कारखाने बंद आहेत. रोजची कमाई करून रोज खाणाऱ्यांपुढे आज काय खावे? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा या संकटाच्या स्थितीमध्ये गोरगरिबांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत. यामध्ये सामाजिक संस्था आहेत. अधिकारी-कर्मचारी आहेत. लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकही आहेत. या सर्वांचे प्रयत्न मला दामाजीपंत आणि देव मामलेदार यांची आठवण करून देतात.
सन 2001 साली मी महसूल खात्यात उपजिल्हाधिकारी पदावर रुजू झालो. प्रत्येक खात्यामध्ये आपल्या खात्याने इतिहास काळात काय पराक्रम केलेले आहेत, याच्या काही कथा-गोष्टी-किस्से प्रचलित असतात. त्या ऐतिहासिक गोष्टींमधील दोन पात्रे म्हणजे दामाजीपंत आणि देव मामलेदार.
दामाजीपंत हे 15 व्या शतकात होऊन गेले. ते बिदरच्या बहामनी सुलतान शाहीत आजच्या पंढरपूर जवळील मंगळवेढ्याला कमाविसदार पदावर कार्यरत होते. कमाविसदार म्हणजे तत्कालीन मुख्य राजस्व अधिकारी. महिपतीने लिहिलेल्या भक्तीविजय या ग्रंथात दामाजीपंतांची माहिती मिळते. १४६० साली महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला होता. यावेळी दामाजीपंत हे बहामनी राज्याच्या मंगळवेढा येथील शासकीय धान्य गोदामाचे प्रमुख होते. दुष्काळ अतिशय भयंकर होता. लोक अन्नावाचून तडफडून मरत होते. अशातच एक याचक दामाजीपंतांकडे आला. तो याचक अन्नासाठी गयावया करू लागला. वारकरी संप्रदायाचे असणारे दामाजीपंत यांना गरिबांचा कळवळा होता. त्यांच्या घरून कोणीही,कधीही भुकेल्या पोटी जात नसे. त्यांनी त्या याचकाला घरात बोलावून घेतले. त्याला जेवू घातले. त्या याचकाने दामाजीपंतांना सांगितले की त्याचे कुटुंब पंढरपूरला आहे .त्याची पत्नी आणि मुले हे अन्नासाठी तडफडत आहेत. त्यांना अन्न मिळाले नाही तर त्यांचा मृत्यू निश्चित आहे. हे ऐकून दामाजीपंतांचे हृदय द्रवले. त्यांनी आपल्या अधिनस्त असणाऱ्या लोकांकरवी त्या याचकाच्या कुटुंबासाठी पंढरपूरला धान्य पाठवले. परंतु दुष्काळाने होरपळून निघालेल्या इतर लोकांनी धान्य लुटून घेतले. दामाजीपंतांकडून लोकांची ही व्यथा बघवल्या गेली नाही.
लोकांची उपासमार टाळण्यासाठी आपण शासकीय धान्य गोदामातील धान्य वाटले तर ? असा विचार त्यांच्या मनात आला. पण असे करण्यात फार मोठी जोखीम होती. सुलतानापर्यंत ही बाब गेली तर संकट प्राणावर बेतणार होते. तरीही दामाजीपंतांनी प्राणांची बाजी लावण्याचा निर्णय घेतला. शासकीय धान्य गोदामातील धान्य दामाजीपंतांनी गोरगरिबांना वाटले. तेव्हाचा मुजुमदार( म्हणजे आजचा डेप्युटी कलेक्टर) यांने सुलतानाकडे घडलेल्या घटनेचा अहवाल पाठवला. सुलतान रागावला. त्याने दामाजीपंतांना बोलावण्यासाठी सैनिक पाठवले आणि पुढे दामाजीपंतांनी सर्व रकमेचा भरणा केला. अशी काहीशी चमत्काराचा आधार घेणारी कथा देखील आहे. बराच काळपर्यंत दामाजीपंत हे एक काल्पनिक पात्र आहे असे समजले जात होते. परंतु इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी अस्सल कागदपत्रांचा आधार घेत दामाजीपंतांचे ऐतिहासिकत्व सिद्ध केले. महसूल खात्यातील हे सहृदय अधिकारी दामाजीपंत वारकरी संप्रदायात आज एक प्रमुख संत म्हणून ओळखले जातात.
साधारणत पाच वर्षापूर्वी नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान देण्याचा योग मला आला. गोदावरीतटी रामकुंडासमोरील यशवंतराव महाराज पटांगणावर हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शेजारीच देव मामलेदार यांचे मंदिर होते. अधिक विचारपूस केली तेव्हा देव मामलेदार यांची कथा मला कळाली.
देव मामलेदार अर्थात श्री. यशवंतराव भोसेकर यांचा जन्म 13 सप्टेंबर 1815 रोजी पुण्यात ओंकार वाड्यात झाला. त्यांचे मुळगाव सोलापूर जिल्ह्यातील, पंढरपूर तालुक्यातील भोसे हे होते. यशवंतराव यांच्या मनात गोरगरिबांविषयी कणव होती. गोरगरिबांची सेवा करणे हेच त्यांनी आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट मानले होते .इसवी सन 1829 ते 1872 अशी तब्बल 43 वर्षे त्यांनी महाराष्ट्राच्या विविध भागात महसूल खात्यात विविध पदांवर नोकरी केली. ते येवला, चाळीसगाव, एरंडोल, अमळनेर, शहादा, धुळे, शिंदखेडा व सटाणा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. सटाणा येथूनच ते निवृत्त झाले.
इसवीसन 1870 -71 मध्ये महाराष्ट्रात महाभयंकर दुष्काळ पडला होता. माणसे आणि जनावरे अन्नाविना तडफडून मरत होती. खायला अन्न नव्हते. प्यायला पाणी नव्हते. कावळे आणि गिधाडांना मात्र सुगीचे दिवस आले होते. श्री. यशवंतराव भोसेकर त्यावेळी बागलाण तालुक्यात तहसीलदार होते. त्यांनी आपली सर्व मालमत्ता विकून टाकली आणि आलेली रक्कम गोरगरिबांना अन्नधान्यासाठी वाटून टाकली. परंतु या रकमेतून सर्व गरिबांची गरज ते भागवू शकले नाही. तेव्हा यशवंतरावांनी सरकारी तिजोरीतील रक्कमही दुष्काळग्रस्त गोरगरिबांना वाटून टाकली. ती रक्कम होती तब्बल एक लाख 27 हजार रुपये. त्याकाळी ही फार मोठी रक्कम होती. तेव्हापासून या दयाळू तहसीलदाराला अर्थात मामलेदाराला लोक देव मामलेदार म्हणून ओळखू लागले. 11 डिसेंबर 1887 रोजी नाशिक येथे देव मामलेदार यांचा मृत्यू झाला. नाशिककरांनी गोदावरीतटी रामकुंडासमोर त्यांचे समाधी मंदिर बांधले व त्या परिसराला यशवंतराव महाराज पटांगण असे नाव दिले.
अन्नासाठी तडफडणार्या गोरगरिबांकरिता कार्य करणारे महसूल खात्यातील अधिकारी दामाजीपंत आणि यशवंतराव भोसेकर यांचे नाव इतिहासात अजरामर झालेले आहे. आज कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे गंभीर परिस्थिती उद्भवलेली आहे. परप्रांतातील मजूर आपल्याकडे अडकून पडलेले आहेत. सर्वत्र बंद असल्यामुळे स्थानिक मजुरांनाही रोजगार नाही. अशा या कठीण परिस्थितीमध्ये अनेकांनी आपली कोठारे आणि तिजोऱ्या उघड्या केलेल्या आहेत. दररोज हजारो लोकांना अन्नदान केले जात आहे. गरजूंपर्यंत धान्याची पाकिटे पोहोचविल्या जात आहेत. यात सामान्य नागरिक, सर्व खात्यातील प्रशासकीय अधिकारी- कर्मचारी, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी इत्यादी सर्वांचा सहभाग आहे. या सर्वांचे कार्य पाहून मनोमन एवढेच म्हणावेसे वाटते की हे सर्वजण आधुनिक काळातील दामाजीपंत आणि देव मामलेदार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गरीबांची भूक भागविणाऱ्या या सर्वांच्या कार्याला मनापासून सलाम!
:-राजेश खवले,उपजिल्हाधिकारी,अकोला मोबा : 9850345176
——————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7588214814 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज