टीम मंगळवेढा टाईम्स ।
घरगुती भांडणामुळे माहेरी गेलेली पत्नी दोन महिन्यानंतरही परत न आल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
काल रविवारी दुपारी बाराच्या सुमारास पासलेवाडी येथे ही घटना घडली अक्षय रंभाजी सलगर (वय २५, रा.पासलेवाडी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
अक्षय सलगर याचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. घरगुती कारणावरुन त्याची व पत्नीची वारंवार तक्रार होत होती. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी पत्नी माहेरी निघून गेली होती.
ती सध्या माहेरीच राहत होती. दरम्यान, अक्षयने रविवारी दुपारी बाराच्या सुमारास पत्नीच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करत मी आत्महत्या करणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर पत्नीने सासरे रंभाजी सलगर यांना फोन करून ही घटना सांगत घरी जाण्याची विनंती केली होती. त्यानंतर कुरुल येथे असलेले रंभाजी सलगर हे गावी पासलेवाडी येथे गेले तेव्हा त्यांच्या घरासमोर नातेवाईक जमा झाल्याचे दिसले.
अक्षय याने घरात असलेल्या पत्र्याच्या अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले.
याप्रकरणी मृत अक्षय याचे वडील रंभाजी सलगर यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस नाईक सचिन मुसळे तपास करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज