टीम मंगळवेढा टाईम्स।
पंढरपूर येथील शेतकऱ्यांचा राजवाडा असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे.
डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील गटाने या निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे.या निवडणुकीमुळे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे.
अठरा वर्षांनंतर विठ्ठल कारखान्यांच्या निवडणुकीत सत्तांतर झाले आहे. कारखान्याचे संस्थापक औदुंबर पाटील यांचे नातू युवराज पाटील यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे.
कारखान्याच्या सहा ऊस उत्पादक गटातून दोन हजार मतांच्या आघाडीने वीस जागांवर विजय मिळवला. तर सत्ताधारी आघाडीला संस्था प्रतिनिधी मतदार संघातील एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांची गेल्या 18 वर्षापासून विठ्ठल कारखान्यावर सत्ता होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भालके हे कारखान्याचे अध्यक्ष झाले होते.
अलीकडेच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
त्यानंतर आता झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ही राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे.
काल सकाळपासून मतमोजणी सुरू होती. सुरुवातीपासूनच अभिजीत पाटील गटाने भालके काळे व युवराज पाटील गटावर आघाडी घेतली होती.
रात्रभर मतमोजणी झाल्यानंतर आज सकाळी निवडणुकीचे कल स्पष्ट झाले आहेत.
यामध्ये कारखान्याच्या सहा ऊस उत्पादक गटातून जवळपास दोन हजार मतांची आघाडी घेत विजय पाटील गटाने विजय मिळवला आहे.(स्रोत:सरकारनामा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज