टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील डॉक्टर, वकील, माजी शिक्षणाधिकारी, व्यापारी, शेतकरी असे 70 लोकांचे सजग नागरिक शिष्टमंडळ उद्या दि.12 रोजी दुपारी 3 वाजता रेल्वेने दिल्लीकडे मार्गस्थ होणार असून
येथील प्राथमिक, माध्यमिक व वैद्यकीय शिक्षण, वीज सेवा, आरोग्य विषयक याचा अभ्यास करणार असल्याची माहिती शिष्टमंडळाचे प्रवर्तक अॅड.धनंजय हजारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दिल्ली येथे तेथील सरकारने शिक्षणामध्ये मोठी क्रांती केली आहे. शेती उद्योग सुधारून प्रगती केली आहे. त्याचबरोबर तेथील लोकांना मोफत वीज सेवा दिली जात आहे.
या सर्व घटकांचा मंगळवेढयातील सजग नागरिक शिष्टमंडळ स्वखर्चाने प्रत्यक्ष जावून अभ्यास करणार आहेत. दिल्ली सरकार तेथील विद्यार्थ्यांना कुठलीही फी न आकारता उच्च दर्जाचे शिक्षण देत आहे.
आपलेही विद्यार्थी त्याच धर्तीवर घडावेत अशी भावना मंगळवेढेकरांची असून या सर्व सजग नागरिकांनी एकत्र येवून त्याचा विचार केला आहे. यासाठी हे शिष्टमंडळ दिल्लीकडे दि.12 रोजी रवाना होत आहे.
यामध्ये सर्व क्षेत्रातील अनुभवी तज्ञ मंडळी आहेत. वैद्यकीय शिक्षण चांगल्या पद्धतीने मुलांना दिल्यानंतर आपल्यातही सुधारणा होईल ही भावना येथील जाणकारांची आहे. तेथील सरकार जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने हेल्थ इन्शुरन्स देत आहे.
महाराष्ट्रात हीच योजना महात्मा फुले नावाने राबवली जात आहे. यामध्ये भरघोस मदत देण्याऐवजी तुटपुंजी मदत दिली जात आहे.
दिल्ली सरकार मुलांना पुस्तके, गणवेश, शैक्षणिक साहित्य व मध्यान्ह भोजन आदि मोफत पुरवत असताना महाराष्ट्रात हे का शक्य नाही असा सवाल सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी ज्ञानदेव जावीर यांनी केला आहे.
दरम्यान दिल्लीतील विविध विभागात केलेल्या उत्कृष्ठ कामाची पाहणी करून हे शिष्टमंडळ मंगळवेढयात याचा प्रयोग करून मंगळवेढयाला विकासाच्या दिशेने नेणार आहे.
या झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थितांना अॅड.भारत पवार, कृषी उद्योजक प्रा.संजय कट्टे, अॅड.धनंजय हजारे, अॅड.दत्तात्रय खडतरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी न.पा.चे माजी नगरसेवक प्रविण खवतोडे, अरूण किल्लेदार, बबलु सुतार, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी हणमंत कोष्टी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज