मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सध्या रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी एकत्रित आल्याने भाजप या निवडणुकीत निष्प्रभ ठरले आहे. भाजपला संधी असून या निवडणुकीत त्यांचे उमेदवार सर्व ठिकाणी मैदानात उतरू शकले नाहीत.
शनिवारी (ता. 29) या बाजार समितीसाठी मतदान होणार असून या निवडणुकीत कोकण महसूल विभागातून पाच, नाशिक महसूल विभागातून आठ, पुणे महसूल विभागातून पाच, औरंगाबाद महसूल विभागातून अकरा, अमरावती व नागपूर महसूल विभागातून प्रत्येकी सात उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
या मतदार संघातील 43 उमेदवारांचे नशीब 3 हजार 926 मतदारांच्या (त्या त्या जिल्ह्यातील बाजार समित्यांचे संचालक) हातात आहे. सर्वाधिक चुरस औरंगाबाद महसूल विभाग मतदारसंघात असून येथे तब्बल अकरा उमेदवार मैदानात उतरले आहेत. याशिवाय मुंबई बाजार क्षेत्रातील धान्य, डाळी खाद्यतेल व्यापारी मतदारसंघातून तीन उमेदवार रिंगणात असून या मतदारसंघात 877 मतदार आहेत.
मुंबई बाजार क्षेत्रातील इतर सर्व विक्री वस्तूंचे व्यापारी या मतदारसंघातूनही तीन उमेदवार रिंगणात असून 1 हजार 78 मतदार याठिकाणी आहेत. मुंबई बाजार क्षेत्रातील भाजीपाला व्यापारी मतदारसंघातून चार उमेदवार रिंगणात आहेत. या ठिकाणी 1 हजार 719 मतदार आहेत. मुंबई बाजार क्षेत्रातील कांदा, बटाटा व लसणाचे व्यापारी या मतदारसंघातून तीन उमेदवार मैदानात असून 833 मतदार या मतदारसंघात आहेत. या निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर मतदान केंद्र देण्यात आले असून शनिवारी सकाळी आठ ते पाच या वेळेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतदान होणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज