मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि खूनप्रकरणातील चारपैकी एका दोषीने डेथ वॉरंटविरोधात सादर केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने आज सुनावणी घेण्यास नकार देत संबंधित दोषीला सत्र न्यायालयामध्ये धाव घेण्याची मुभा दिली, यामुळे आता अन्य तीन नराधमांची फाशीची शिक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
न्या. मनमोहन आणि न्या. संगीता धिंग्रा सेहगल यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणाची सुनावणी झाली. सत्र न्यायालयाने याआधी ७ जानेवारी रोजी दोषी मुकेशकुमार सिंह याच्याविरोधात डेथ वॉरंट बजावण्याचा निर्णय घेतला होता, कनिष्ठ न्यायालयाच्या या निकालामध्ये काहीही चूक नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दिल्ली सरकारचे वकील राहुल मेहरा यांनी न्यायालयास सांगितले की, ”आता यातील एका दोषीने दया याचिका सादर केली असल्याने अन्य तिघांच्या शिक्षेवर अंमलबजावणी होऊ शकत नाही. तुरुंग नियमांनुसार तसे करणे बंधनकारक आहे. मुकेशप्रमाणे त्याचे अन्य सहकारीदेखील तोच मार्ग अवलंबिणार का हे पाहणेदेखील गरजेचे आहे.” यावर न्यायालय म्हणाले की, ”आता सर्व दोषी दया याचिका सादर करत नाही तोवर तुम्हाला कारवाई करता येणार नसेल, तर तुमचे नियम वाईट आहेत. येथे अर्जाचा प्रश्नच निर्माण होत नाही. सगळ्या व्यवस्थेलाच कर्करोग झाला आहे.” यावर तुरुंग प्रशासनाचा बचाव करताना मेहरा म्हणाले की, ”दोषी हे सध्या नैराश्यात असून, त्यामुळेच ते शिक्षेची अंमलबजावणी होऊ नये म्हणून दया याचिका आणि अन्य कायदेशीर मार्गांचा आधार घेत आहेत. या सर्व दोषींच्या शिक्षेसाठी २२ जानेवारी ही तारीख नियमानुसार ठरविण्यात आली होती. आता या दोषीच्या दयायाचिकेवर २१ जानेवारी दुपारपर्यंत निर्णय घेण्यात आला नाही, तर तुरुंग प्रशासनाला नव्याने डेथ वॉरंटसाठी सत्र न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागेल. २२ जानेवारीच्या आधी किंवा नंतर दयायाचिका फेटाळून लावण्यात आली तरीसुद्धा सत्र न्यायालयाकडून पुन्हा डेथ वॉरंट मिळवावे लागेल.”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज