मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर जिल्ह्यातील 21 साखर कारखान्यांनी आतापर्यंत 28 लाख 48 हजार 576 मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यातून 25 लाख 57 हजार 928 साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निम्म्या क्षमतेनेच कारखाने सुरू आहेत. त्यामुळे साखर उत्पादनात कमालीची घट झाली आहे.
जाहिरातीसाठी संपर्क: 7588214814
यंदाच्या गळीत हंगामात 33 साखर कारखान्यांपैकी केवळ 21 साखर कारखान्यांनी आपला बॉयलर पेटवला आहे, तर तब्बल 12 साखर कारखानदारांनी उसाची वाईट स्थिती पाहून कारखाने बंद ठेवणे पसंत केले आहे. जे कारखाने सुरू आहेत, त्यातील बोटावर मोजण्याइतपत कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.बहुसंख्य कारखान्यांत 50 टक्क्यांपेक्षा कमी क्षमतेने ऊस गाळप सुरू आहे.
गाळप क्षमतेत माढ्यातील विठ्ठलराव शिंदे हा साखर कारखाना पुढे आहे, तर संत दामाजी साखर कारखान्याची गाळप क्षमता सर्वात कमी आहे. सिध्देश्वर साखर कारखाना 1 लाख 4 हजार मेट्रिक टन, सहकारमहर्षी अकलूज 3 लाख 2 हजार मेट्रिक टन, पांडुरंग श्रीपूर 2 लाख 56 हजार मेट्रिक टन, संत दामाजी मंगळवेढा 35 हजार, विठ्ठलराव शिंदे माढा 4 लाख 89 हजार, सासवड माळी माळीनगर 1 लाख 63 हजार, विठ्ठल शुगर म्हैसगाव 77 हजार मेट्रिक टन, जकराया वटवटे 1 लाख 47 हजार मेट्रिक टन, भैरवनाथ शुगर विहाळ 43 हजार मेट्रिक टन, फॅबटेक शुगर बालाजीनगर 64 हजार मेट्रिक टन, भैरवनाथ शुगर लवंगी 56 हजार मेट्रिक टन, युटोपियन शुगर 1 लाख 74 हजार, जयहिंद शुगर आचेगाव 1 लाख 58 हजार मेट्रिक टन, विठ्ठलसाई मुरूम 1 लाख 1 हजार मेट्रिक टन, कंचेश्वर मंगरूळ 53 हजार मेट्रिक टन असे एकूण 22 लाख 30 हजार 103 मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. 19 लाख 59 हजार 274 हजार साखरेच्या पोत्यांचे उत्पादन झाले आहे.
गेल्यावर्षी जिल्ह्यात केवळ 38 टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे उसाच्या लागवडीत घट झाली होती. याचवेळी हुमणीनेही उसाला ग्रासले होते. त्यातच ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका दुष्काळातून तरलेल्या उसाला बसला. याचा एकत्रित परिणाम म्हणून यंदाच्या वर्षी उसाच्या उत्पादनात कमालीची घट झाली. त्यामुळे गाळपासाठी ऊस आणायचा कुठून, असा प्रश्न साखर कारखान्यांसमोर उभा राहिला आहे. धाडस करत ज्या कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे, त्या कारखान्यांकडून ऊस मिळविण्यासाठी शेतकर्यांना उसाचे अॅडव्हान्स पेमेंट दिले जाऊ लागले आहे. तरीही ऊस मिळणे अवघड झाले आहे.
पूर्ण क्षमतेने कारखाना चालत नसल्यामुळे कारखानदारांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. बँकेचे हप्ते आणि कामगारांची पगारापोटीची देणी कशी द्यायची, त्याचबरोबर कोट्यवधींच्या कर्जाची परतफेड कशी करायची, याची चिंता कारखानदारांना सतावू लागली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज