टीम मंगळवेढा टाईम्स।
उजनी धरणातून आता शेतीसाठी डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडले आहे. अडीच हजार क्युसेकचा विसर्ग आता गरजेनुसार दोन हजार ८०० ते तीन हजारांपर्यंत करण्यात आला आहे. शेतीसाठी सोडलेले पाणी आता १२ फेब्रुवारीपर्यंत सुरूच राहणार आहे.
सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासह धाराशिव शहरासाठी उजनी धरणाचा मोठा आधार आहे. उजनीत सध्या उपयुक्त पाणीसाठा ३ टीएमसीपर्यंत असून एकूण धरणात ६६.९० टीएमसी पाणी शिल्लक आहे.
त्यात १६ ते १८ टीएमसीपर्यंत गाळ आहे. त्यामुळे शेतीचे आवर्तन संपल्यावर धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे. पावसाळ्यापर्यंत उजनीतून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून किमान दोनवेळा पाणी सोडावे लागणार आहे.
दुसरीकडे धाराशिव, कर्जत- जामखेड, इंदापूर, बारामती या शहरांसह सोलापूर शहर व सोलापूर जिल्ह्यातील १००पेक्षा अधिक ग्रामपंचायती, नगरपालिकांना उजनीतूनच पाणी पुरवठा होतो. पण, यंदाच्या पावसाळ्यात उजनी अवघी ६६ टक्क्यांपर्यंतच भरले होते. त्यानंतर शेतीसाठी दोनवेळा आवर्तने सोडण्यात आली.
सोलापूर शहरासाठीही एक आवर्तन सोडले. त्यामुळे धरण आता ६ टक्क्यांवर आले आहे. उजनीतील साठा कमी झाल्यावर कॅनॉलमधून पाणी सोडता येत नाही. धरण उणे २० टक्के झाल्यावर नदीशिवाय पाणी सोडता येत नाही.
पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणीसाठा उणे ५० टक्क्यांवर गेल्यास महापालिकेला लाखोंचा खर्च करून दुबार-तिबार पंपिंग करावे लागणार आहे.
चारा टंचाईची तीव्रता होईल कमी
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डाव्या व उजव्या कालव्यातून पुन्हा एकदा पाणी सोडण्यात आले आहे. डिसेंबरअखेर बंद झालेले कालव्यातील पाणी १२ जानेवारीपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सुटेल, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कमी होईल या हेतूने हे यंदाच्या उन्हाळ्यातील शेवटचे आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनामुळे किमान मार्चपर्यंतचा चारा प्रश्न सुटेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज