टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्य शासनाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्री उशिरा १ ते १५ जून या कालावधीत ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांना दिलासा देत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत तर कृषी संबंधित दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे.
सोलापूर शहरात पूर्वीप्रमाणेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू राहतील. या कालावधीत नागरिकांनी शारीरिक अंतर ठेवणे व मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासन आदेशाची अंमलबजावणी न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
हे आदेश सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी लागू करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त पी . शिवशंकर व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेशात म्हटले आहे. ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थानिक स्तरावर संपूर्ण ग्रामीण भागात लॉकडाऊन केला होता.
आता सकाळी सात ते अकरा या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक , लसीकरण, वैद्यकीय विमा कार्यालय , फार्मसी कंपन्या , वैद्यकीय आणि आरोग्य सेवांमध्ये समाविष्ट असणारे उत्पादन वितरण करणारे घटक, मास्क , वैद्यकीय उपकरणे व त्याच्याशी निगडित सर्व सहाय्यक बाबी यांचा समावेश आहे.
पशुवैद्यकीय सेवा , पशू संगोपन केंद्र हेही सुरू राहतील. सर्व किराणा दुकाने , भाजीपाला दुकाने , फळांची दुकाने , डेअरी बेकरी आणि सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने सुरू राहतील. त्यामध्ये चिकन , मटण , मासे , अंडी , पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
कृषी निगडित सेवा अनेक कृषी उत्पादन सुरळीत सुरू राहण्यासाठी बियाणे , खते , कृषी अवजारे व त्यांची दुरुस्ती हे उपक्रम सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे . अत्यावश्यक सेवा या प्रकारात जी दुकाने आहेत त्या दुकान मालकांनी व तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे.
अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकान मालकांना, काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने कोरोना नियमांचे पालन करावे , नियमांचे पालन न केल्यास पाचशे रुपये दंड करण्यात येणार आहे.
सार्वजनिक वाहतूक ऑटो रिक्षामध्ये ड्रायव्हर आणि दोन प्रवासी , टॅक्सी , कारमध्ये आरटीओच्या नियमानुसार ५० टक्के क्षमतेस परवानगी राहणार आहे. बसमध्ये बसण्याच्या जागेच्या पूर्ण क्षमतेने परवानगी असेल. उभे राहून प्रवास करता येणार नाही.
सर्व शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांच्या एकूण क्षमतेच्या १५ टक्के उपस्थिती कर्मचारी ठेवता येईल.कोरोनासंबंधी शासकीय कार्यालयात कर्मचारी उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. सरकारी कंपन्या , सरकारी कार्यालयांत सर्व बैठका ऑनलाइन पद्धतीने घ्यायच्या आहेत.
केंद्र शासन , राज्य शासनाची कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्था यांना सूट देण्यात आली आहे. सहकारी सार्वजनिक उपक्रमातील आणि खासगी बँका , इन्शुरन्स , मेडिकल कंपनी , औषधी उत्पादनाचे व्यवस्थापन वितरण करणाऱ्या कंपन्यांची कार्यालये , डीलर्स यांचा यामध्ये समावेश आहे.
खासगी बस सेवा ही फक्त आणीबाणीच्या सेवेसाठी वापरण्यात येणार आहे. खासगी वाहतूक सेवा एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी आहे . आंतरजिल्हा व आंतर शहर सेवा प्रवासाच्या राहत्या शहरापुरती मर्यादित असावी.
रेस्टॉरंट , हॉटेल आणि बार हे एकत्रित बसून सेवा देण्यास बंद राहतील , हॉटेल आणि रेस्टॉरंट आवारात वास्तव्यास असलेल्या आणि हॉटेलचा भाग असलेल्या अंतर्गत सुरक्षेसाठी रेस्टॉरंट अँड बार सेवा सुरू राहतील.
हॉटेलमध्ये फक्त होम डिलिव्हरी आणि पार्सल सेवेला परवानगी आहे. रेस्टॉरंट किंवा बारमध्ये प्रवेश नसेल. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे , या नियमाचा भंग केल्यास एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे, संबंधित आस्थापनेकडून दहा हजार रुपये दंड आकारणी करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
रस्त्याकडेची खाद्यपदार्थ विक्री करण्यास परवानगी राहणार नाही. पार्सल सेवा व घरपोच सेवा सकाळी ७ ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे . जे ग्राहक व विक्रेते नियमांचे पालन करणार नाहीत त्यांना पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
वृत्तपत्रे , मासिके , नियतकालिके यांची छपाई व वितरण सुरू राहील . यामध्ये फक्त घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात असेल. उत्पादन क्षेत्रे ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सुरू राहतील.कामाच्या ठिकाणी प्रत्येक कामगाराचे तापमान तपासावे एखादा कर्मचारी बाधित आढळून आल्यास संपर्कातील सर्व कामगारांची आरोग्य तपासणी करावी.
काय बंद राहणार…
शहर-जिल्ह्यातील सलून दुकाने उघडण्यास परवानगी नाहीच
मंदिरे, धार्मिक स्थळांना परवानगी नाहीच; नियम पाळून नित्यपूजा करता येईल
सिनेमागृहे, नाट्यगृहे व मनोरंजनाची कोणतीही सेवा सुरू राहणार नाही
अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य कोणत्याही दुकानांना परवानगी नाही
आदेशातून शेतकऱ्यांना दिलासा
पावसाळ्याच्या तोंडावर आता शेतीच्या कामाला वेग येतो. त्यामुळे शेतीशी निगडित सेवा आणि कृषी उत्पादनाविषयक सर्व सेवा सुरळीत राहण्यासाठी बियाणे, खते, कृषी अवजारे, त्याची दुरुस्ती या दुकानांना सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत परवानगी राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज