टीम मंगळवेढा टाईम्स ।
१० पोते कांदा विकल्यावर सर्व खर्च वजा जाता फक्त २ रुपयाची पट्टी शेतकऱ्यास मिळाली. याबाबत त्या व्यापाऱ्याने शेतकऱ्यास २ रुपयाचा चेक दिला.
त्यानंतर व्यापाऱ्याने केलेल्या शेतकऱ्याच्या थट्टेबाबत सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या.
दरम्यान, व्यापाऱ्याने रोख पैसे न देता चेक दिल्याने संबंधित व्यापाऱ्याचा परवाना पंधरा दिवसांसाठी निलंबित केला आहे. याबाबतचा आदेश बाजार समितीचे सचिव सी.ए. बिराजदार यांनी नुकताच काढला आहे.
जे व्यापारी शेतकऱ्यांना रोख पट्टी देणार नाहीत, त्यांच्यावर बाजार समितीकडून कारवाई करण्यात येणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथील राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकऱ्याने सोलापुरातील बाजार समितीत १० पोते कांदे विकण्यास आणले होते.
लिलाव झाला अन् भाव मिळाला. पट्टी तयार करण्यासाठी अडत व्यापाऱ्याने पावती पुस्तक काढले तेव्हा शेतकऱ्याला केवळ दोन रुपये ४९ पैसे देणे निघाले, विकलेला कांदा, त्याचे वजन आणि भाव पाहता कांद्याचे एकूण ५१२ रुपये झाले.
त्यामधून हमाली ४०.४५ रुपये, तोलाई २४.०६ रुपये, मोटारभाडे १५, रोख उचल ४३० असा खर्च वजा जाता १० पोते कांदे विकल्यावर फक्त २ रुपये ४९ पैसे पट्टी मिळाली.
या पट्टीची चिठ्ठी अन् अडत्याने शेतकऱ्याला दिलेला चेक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत होती. शिवाय स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनीही या घटनेवर निषेध व्यक्त करून सरकारविरोधात तीव्र शब्दात टीका केली होती. त्यानंतर बाजार समितीने पट्टीची रोख रक्कम न देता चेक दिल्याने कारवाई केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज