टीम मंगळवेढा टाईम्स ।
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरी मुलगी पळून गेल्याची घटना करमाळा तालुक्यातील पाडळी येथे घडली आहे पळून गेली ती पुन्हा आलीच नाही पळून गेलेली विवाहिता ही पुन्हा माघारी येण्यासाठी नवरदेवाकडे पैसे मागत होती.
मात्र, आपली फसवणूक झाल्याचे नवरदेवाकडील मंडळींच्या लक्षात आल्याने तिला पैसे पाठवले नाहीत याबाबत पोलिसात मात्र अद्याप कोणीही तक्रार दिली नसल्याचे समजते.
पाडळी येथील एका तरुणाचा विवाह करण्याच्या दृष्टीने पालकांनी एजंटशी संपर्क साधला. त्याने तुम्हाला सोलापूरची मुलगी देतो, तिला नातेवाईक कोणी नाहीत फक्त मावशी आहे , असे सांगून दीड लाख रुपये घेतले.
त्यानंतर १५ दिवसापूर्वी मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम कर्नाटकातील एका मंदिरात ठेवला. तिथे एकमेकाची पसंती झाली व लगेच लग्न विधी केला. यासाठी वर पित्याला सर्व खर्च करायला लावला.
तेथे जेवण , प्रवास व इतर असा सुमारे एक लाख खर्च तर नवरीला तोळ्याचे दागिने मजुरीसह ६० हजार खर्च केला. यावेळी मंदिरात नवरी मुलगी व तिची फक्त एक मावशी होती.
लग्न झाल्यानंतर नवरा-नवरी पहाटे चार वाजता पाडळीला आले त्यानंतर पहिला दिवस देवदर्शन करून घरी आले. आणि लगेच नवरीचा मानलेला भाऊ आला व नवरीला घेवून गेला.
त्यानंतर नवरी परत आलीच नाही. याबाबत नवरदेवाच्या घरच्या मंडळींनी संपर्क साधला असता नवरीने व तिच्या नातेवाईकांनी सांगितले की ती नांदायला येणार नाही. तुम्हाला सह्या पाहिजे तिथे घ्या, पण ती नांदायला येणार नाही.
यावेळी वर पक्षाची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यातील नवरदेव हा साधारण ३० वर्षांचा अल्पशिक्षित आहे. याबाबत कोणाकडूनही कसल्याही पद्धतीची तक्रार करमाळा पोलीस स्टेशनला नोंदवली गेली नसल्याचे समजते.
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी चक्क नवरी मुलगी पळून गेल्याने सदरचा विषय संपूर्ण तालुक्यात चर्चेचा ठरला आहे.
सध्या करमाळा शहर व तालुक्यात अल्पवयीन मुली तसेच विवाहित महिला पळून जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज